Draupadichi thali लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Draupadichi thali लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २८ जुलै, २०२४

द्रौपदीची थाळी आणि मेथीची भाजी




लेखाचं नाव वाचून जरा बुचकाळ्यात पडला असाल, तरी पुढे खुलासा होईल. महाभारताच्या वनपर्वात दुर्वास ऋषी आणि द्रौपदीच्या थाळीची गोष्ट आहे. आपल्यापैकी बहुतेकांना ही गोष्ट माहीत आहे. तरी थोडक्यात एकदा सांगायचं तर पांडव वनवासात असताना दुर्वास ऋषी हस्तिनापूरमध्ये येतात. तेव्हा दुर्योधन एका विशिष्ट हेतूने त्यांची भरपूर सेवा करतो. दुर्योधनावर प्रसन्न होऊन दुर्वास त्याला हवे ते मागण्याची आज्ञा देतात. तेव्हा पांडवांची फजिती करण्यासाठी अगदी नाटकीपणे दुर्योधन त्यांना विनंती करतो की,‘गुरुदेव माझे बंधू सध्या वनात  आहेत, जसा तुम्ही माझ्यावर अनुग्रह केलात तसाच त्यांनाही आपले आदरातिथ्य करण्याची संधी द्यावी, ही विनंती आहे.’ दुर्वासांचे आदरातिथ्य म्हणजे जणू काही सत्त्वपरीक्षाच, याची जाणीव दुर्योधनाला होती. वनात पांडवांना योग्य आदरातिथ्य कसे करता येईल, मग दुर्वास पांडवांना नक्कीच शाप देतील, हा या विनंतीमागचा खरा हेतू होता.  

दुर्योधनाच्या विनंतीनुसार हस्तिनापुरातून परीक्षा घेण्यासाठी वनात आपल्या दहा हजार शिष्यांसह आलेले दुर्वास. त्यांनी द्रौपदीकडे केलेली भोजनाची मागणी. द्रौपदीला सूर्याने एक थाळी दिली होती. ज्या थाळीतून द्रौपदी जोपर्यंत जेवत नाही तोपर्यंत भोजन मिळत असे. पण दुर्वास नेमके तिचे जेवण झाल्यावर हजर झाले आणि म्हणाले आम्ही नदीवर जाऊन आंघोळ करून येतो तोपर्यंत आमच्या भोजनाची व्यवस्था करून ठेव. द्रौपदीसमोर मोठा पेच उभा राहिला. तिने कृष्णाचा धावा केला आणि नेहमीप्रमाणे तिच्या मदतीला हजर झाला तिचा सखा कृष्ण. द्रौपदीने कृष्णाला आपली समस्या सांगितली. पण तोसुद्धा आल्याआल्या म्हणाला, “कृष्णे, मला भूक लागली आहे. काही सुचत नाहीये. आधी खायला दे मला काहीतरी. मग तुझं काय ते पाहू.”

त्यावर द्रौपदी म्हणाली,“ कृष्णा, माझं जेवण झालं आहे रे...आता काहीच खायला मिळणार नाही त्या थाळीतून.” पण कृष्ण म्हणाला,“ मला आणून तरी दाखव ती थाळी.”

स्थाल्याः कण्ठे अथ संलग्नं शाकान्नं वीक्ष्य केशवः। उपयुज्य अब्रवीत् एनाम् अनेन हरिः ईश्वरः। विश्वात्मा प्रियताम् तुष्टः च अस्तु इति यज्ञभुक्।।

थोडक्यात सांगायचं तर त्या थाळीच्या कडांना चिकटलेले पालेभाजीचे पान पाहून श्रीकृष्णाने ते खाल्ले आणि तो म्हणाला,“ या पानाने ईश्वर संतुष्ट होवो.” त्यानंतरची गोष्ट आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पांडवांची फजिती करून त्यांना शाप द्यायच्या उद्देशाने आलेले दुर्वास आणि त्यांचे शिष्य यांचं पोट आपोआप भरून गेलं आणि ते नदीवरूनच परतले. आता विश्वात्म्याचं, जगन्नियत्याचंच पोट भरलं म्हटल्यावर इतरांची काय कथा!

तर ही झाली मूळ गोष्ट.माझ्यासाठी या गोष्टीत महत्त्वाचं आहे ते थाळीला चिकटलेलं पान. महाभारताचे काही भाग आणि त्याच्याशी संबंधित साहित्य वाचताना या गोष्टीची वेगवेगळी रूपं सामोरी आली. त्यात कधी त्या थाळीला भाताचं शीत चिकटलेला उल्लेख होता तर कधी भाजीचं पान. आजीने जेव्हापासून ही गोष्ट सांगितली तेव्हापासून ते थाळीला चिकटलेलं भाजीचं पान मनात रेंगाळत होतं. कुठली बरं असेल ती भाजी असा प्रश्न पडला होता. मूळ कथा वाचेपर्यंत मनात मी कायम धावा करत असे की देवा, ते पालेभाजीचं पानच असू दे.

 असं म्हणयचं कारण म्हणजे मोठं होताना आवडीची झाली मेथीची भाजी. मूगडाळ घालून केलेली मेथी, तुरीचं वरण घालून केलेली मुद्दीपल्ल्या, लसणाची खमंग फोडणी दिलेली परतलेली मेथी आणि फक्त जिरे-लसणाच्या फोडणीवर परतलेली मेथी...कुठलाही प्रकार घ्या आजकालच्या फॅन्सी भाज्यांना टक्कर देईल अशी चव. नुसती जिऱ्याच्या फोडणीवर परतलेली खमंग मेथीसुद्धा काय लागते... बाजारातून आणल्यावर  हिरवीगार दिसणारी ती मेथीची पेंडी पाहिल्यावरच तिचा खमंग वास यायचा. पण एवढी मोठी पेंडी आणि तिची ती चोरटी भाजी बघितल्यावर आश्चर्यच वाटायचं, राग यायचा खरंतर. एवढ्या मोठ्या कुटुंबात आपल्या वाट्याला ती किती येणार असं वाटायचं. तीच गत स्वयंपाक करू लागल्यावर झाली. मेथीची भाजी तर आवडीची पण ती होणार केवढीशी हा प्रश्न अजूनही दरवेळी मनात येतो.

पण या मेथीची खास बात काय आहे माहितीये का...एक घास खाऊनही मी तृप्त होते. थोडीशी भाजीसुद्धा मनाला संतुष्ट करून जाते. त्यामुळे माझ्यासाठी तरी या गोष्टीत ते थाळीला चिकटलेलं पानं मेथीच्याच भाजीचं आहे. माझ्या कल्पनाविश्वात तरी श्रीकृष्ण मेथीचंच पान खातो.

आपल्या इतिहासकाव्यातील कथांना अशाच प्रकारे नवी रूपं मिळत असतील आणि प्रतिभेचा नवा साज लेऊन लोककथांच्या रूपात त्या आपल्या समोर येत असतील. शतकानुशतके सांगितल्या जाणाऱ्या या कथांचं कर्तृत्व काळाच्या ओघात लोप पावतं, पण या कथा मात्र अशाच पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतात. आजकाल रात्री झोपताना आजीच्या गोष्टींचा जागी फेरीटेल्सनी घेतली आहे. या गोष्टीलाही हरकत नाही. पण आपल्याला समृद्ध करणाऱ्या या गोष्टी जपण्याची जबाबदारी आपली आहे. मला खात्री आहे आपल्यापैकी प्रत्येकाकडे हा ठेवा असणार आहे. हा ठेवा जपणं त्याची कुठेतरी नोंद करणं गरजेचं आहे, असं वाटतं.

 

ता.क. – खाणं आणि वाचणं या माझ्या आयुष्यातील दोन अत्यंत आवडीच्या गोष्टी आहेत. त्यामुळे कितीही नाही म्हटलं तरी त्यांची सांगड घातलीच जाते.

©तृप्ती कुलकर्णी

छायाचित्र – गुगलच्या सौजन्याने