Childhood लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Childhood लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २ जानेवारी, २०२५

 

सोलापूरचा बैलबाजार आणि आम्ही!




लहानपणी डिसेंबर, जानेवारी म्हटलं की आमच्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारत असे. त्याचं कारण म्हणजे जानेवारी महिन्यात सोलापूरचं ग्रामदैवत श्रीसिद्धेश्वर महाराजांच्या उत्सवात भरणारी गड्ड्याची जत्रा. होम मैदानावर भरणारी ही जत्रा म्हणजे येक नंबरची जत्राच! मोठ्या मैदानावर उभारलेले तंबू, वेगवेगळे पाळणे, मौत का कुआ, आरश्यांची गंमत दाखवणारं दालन, पन्नालाल गाढवाचे खेळ, खाण्यापिण्याचे स्टॉल्स सगळं काही असायचं. हे होम मैदान आमच्या हरिभाई शाळेच्या समोरच असल्यामुळे आम्हाला दिवसाही पहायला मिळायचं हे सगळं. दिवसा सुस्तावलेलं हे मैदान रात्री कात टाकून उत्साहाची, चैतन्याची, रोषणाईच्या झगमगाटाची झूल पांघरून मनोरंजनासाठी सज्ज व्हायचं. घरातल्या मोठ्यांच्या मागे लागून आम्हीपण एक दिवस गड्ड्यावर जाऊन यायचो. कधी नव्हे ते तिथे मिळणारा भाग्यश्रीचा वडा खायला मिळायचा, दूध पंढरीचं सुगंधी दूधही मिळायचं. वर्षभराच्या आठवणी घेऊन आम्ही परत यायचो.

पण या गड्ड्याबरोबरच आमच्यासाठी खास होते ते म्हणजे डिसेंबर महिन्यातले शेवटच्या आठवड्यातील मंगळवार व शुक्रवार आणि संक्रातीपर्यंतचे सगळेच दिवस. आमच्या घराच्या अगदी समोर रेवणसिद्धेश्वर मंदिरासमोरच्या मैदानात भरायचा जनावरांचा बाजार!  डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मंगळवारी सकाळी सकाळी धुकं असताना काही टेम्पो येऊन थांबायचे, त्यातून म्हशी, बैल, शेळ्या उतरवल्या जायच्या आणि मग संध्याकाळी हा एक दिवसाचा बाजार संपायचा. आम्हाला थोडं वाईट वाटायचं. हे असं दोन आठवडे चालायचं. मग जानेवारी सुरू झाल्यावर ही सगळी मंडळी मुक्कामी यायची. दगडांची चौकट रचून विक्रेते आपापल्या सीमा आखून जायचे. मग तिथं आपापली जनावरं घेऊन यायचे. हळूहळू मैदानावरची जमीन दिसेनाशी व्हायची. सगळीकडे फक्त जनावरं दिसायची. रस्त्यावरून चालणं मुश्किल होऊन जायचं. सोलापूरची आणखी एक मजा म्हणजे आम्हाला ख्रिसमस व्हेकेशन नसायची तर ‘गड्ड्याची सुट्टी’ असायची तीही सात दिवस. मग काय आम्ही आणि तो बैलांचा बाजार एवढंच काय ते आमचं विश्व असायचं.

सकाळी उठल्यापासून गॅलरीमधून लांबपर्यंत पसरलेले ते बैल पाहत दिवस सुरू व्हायचा आणि तिथे आलेल्या विक्रेत्यांच्या मनोरंजानासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांच्या आवाजाने तो संपायचा. देवळात सिनेमे दाखवले जायचे, लावणी असायची, गाणी असायची. झोपताना आम्ही हे सगळं ऐकत बसायचो किती तरी वेळ...हो ऐकतच कारण तिथे जायची काही सोय नव्हती. सकाळी आंघोळ आटोपून, अभ्यास उरकून आम्ही खाली पळायचो. मग त्या बाजारातून धिटाईने एक फेरफटका मारायचो. आम्हाला आवडलेल्या उंच्यापुऱ्या बैलांची नावं विचारायचो तिथल्या काकांना. तेव्हा किंमत वगैरे विचारण्याएवढे शहाणे नव्हतो. मग रोज तोच एक उद्योग असायचा आपल्या आवडीचा बैल विकला गेला की नाही हे पाहायचं. आपला बैल विकला गेला की आनंद तर व्हायचाच, पण दुःखही व्हायचं की बाकीच्यांचे आहेत अजून  आपलाच विकला गेला. मग परत दुसरा आवडता बैल शोधायचा. जनावर विकलं गेल्यावर त्याच्या अंगावर झूल चढवायचे, त्याच्या शिंगांना गोंडे बांधायचे. त्याची मिरवणूक काढून देवळासमोर आणून उभं करत आणि तिथे वाकून त्याला नमस्कार करायला लावत. त्यामुळे वाजंत्रीचा आवाज आला की आम्हाला कळायचं की आता बैल विकला गेला. मग ती मिरवणूक पाहायला आम्ही लगेच हजर व्हायचो. जत्रेतून फिरणाऱ्या चंद्रतारा बिडीची जाहिरात आम्हालाही पाठ व्हायची...“तूतूतूतूतारा....चंद्रतारा बिडी ओढा!” घरच्यांच्या कटाक्षांकडे दुर्लक्ष करून आम्ही त्या जाहिरातीची बेधडक री ओढायचो.

 दूरच्या कोपऱ्यात म्हशी असायच्या. मग तिथे जाऊन चिकाचं दूध आणायचं, त्याचा खरवस व्हायचा. हे सगळं करताना हे बैल, म्हशी, गायी हेच आमचं विश्व होऊन जायचे. सकाळी सहा वाजता अंधारात तिथल्या बैलांच्या गळ्यात बांधलेला घंटांचा आवाज, विझत जाणाऱ्या शेकोटीतून निघणारा धूर, तिथे मुक्कामी असणाऱ्या लोकांचा गप्पांचा फड हे सगळं अनुभवत शिकवणीला जायचे मी. तिथल्या स्टॉल्सवर उकळणाऱ्या चहाचा वास, तळलेल्या भज्यांचा वास, हे सगळं काही औरच होतं. थोडी रमतगमत, ही मजा अनुभवत जायचे. आईनं बाजारातून सामान आणायला सांगितल्यावर या बैलांमधूनच वाट काढून जावं लागायचं. गावातल्या जीवनशैलीची सवय नसलेल्या आम्हाला सुरुवातीला थोडी भीती वाटायची या बैलांची, त्यांच्या मोठ्या-मोठ्या शिंगांची. पण तिथले काका सांगायचे,“ काही नाही करत तो. जा बिनधास्त.” मग भीती कमी व्हायची. बिनधास्त चालत, सायकलवर बैलांच्या गर्दीतून वाट काढत जायचो मग.

एरवीच्या शहरी जीवनात काही दिवस का होईना ग्रामीण जीवनाची एक झलक पाहायला मिळायची. आमच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये आपली शिदोरी उघडून बसणारी, तीन दगडांची चूल मांडून काहीतरी खायला बनवणारी ती माणसं, गायी, म्हशी आणि बैलांचे ते आवाज, त्यांची ती गर्दी यामुळे आम्ही एका वेगळ्याच जगात वावरायचो. मित्रमैत्रीणींमध्ये फुशारक्या मारायचो,‘आमच्या बिल्डिंगसमोर ना एवढा मोठा बैल आहे यावर्षी...’ खरंतर काही संबंध नसायचा या सगळ्याचा आमच्याशी. पण त्या तेवढ्या मोठ्या पसाऱ्यात आम्ही सगळी चिरकुट मुलं आपण किती भारी आहोत आपल्याला हे सगळं पाहता येतंय, या मिजाशीत वावरायचो. आता कळतंय की हे सगळं आम्ही अनुभवलं, मनात साठवलं, मुक्तपणे त्या बाजारात वावरलो हे आमचं नशीब होतं. खूप मोठ्या आर्थिक उलाढालीचं केंद्र असणाऱ्या  त्या बाजाराचं स्वरूप आमच्यासाठी मात्र वेगळंच होतं. तिथली आर्थिक गणितं आमच्या गावीही नव्हती.  संक्रातीनंतर हळूहळू बाजार संपत यायचा. सुरुवातीचा जोर उतरायचा, जनावरं विकली जायची, विक्रेते मुक्काम हलवायचे. शाळेतून त्या रिकाम्या रस्त्यावरून येताना नकळत आवंढा गिळला जायचा आणि मनाची समजूत घालायचो पुढल्या वर्षी आहेच की परत हे सगळं... आता तो बाजार भरत नाही तितक्या उत्साहात, तितकी गर्दीही नसते तिथे. पण तो बाजार आजही आम्हा सगळ्या मुलांच्या मनात तसाच आहे, याची खात्री आहे मला.

©तृप्ती कुलकर्णी

छायाचित्र गुगलच्या सौजन्याने

गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०२४

 

धागा आठवणींचा!

 


माझ्या माहेरी उभ्या महालक्ष्मी बसवायची पद्धत नाही. गौरी-गणपतीचे दिवस आले की आम्ही आमच्या आजीच्या मागे भुणभुण करायचो,आपल्याकडे का नसतात गं गौरी? तेव्हा आजी तिच्या गोष्टींच्या पोतडीतून एक गोष्ट काढायची आणि सांगायची. अगं, आपल्याकडे होत्या पूर्वी, पण आपलं गाव आहे ना, हडलगी अगदी डोंगराच्या मधोमध वसलेलं होतं बरं का! आजूबाजूला दाट जंगल होतं. एका वर्षी सगळी पूजा वगैरे झाली आणि आम्ही आत झोपलो होतो, तर वाघ आला आणि गौरी पाडून गेला. तेव्हापासून आपण बसवत नाही गौरी. आम्ही डोळे विस्फारून दरवेळी तेवढ्याच उत्सुकतेने ही गोष्ट ऐकायचो. जेव्हा जेव्हा ती ही गोष्ट सांगायची तेव्हा जाम भारी वाटायचं. डोगरांच्या मधोमध वसलेलं ते गाव, तिथलं अंधारं घर सगळं अगदी डोळ्यांसमोर जसच्या तसं उभं राहायचं. मनाचं तेवढ्यापुरतं समाधानही व्हायचं काहीतरी कारण आहे बरं का आपल्याक़डे गौरी नाहीत याचं!

यावर्षी माझ्या पाहण्यात एक ब्लॉग आला. त्यात असा उल्लेख होता की ज्यांच्याकडे काही कारणाने गौरी बसवण्यात खंड पडतो ते असं सांगतात की वाघाने त्या पाडल्या. तेव्हा आजीने सांगितलेल्या गोष्टीची पुन्हा आठवण झाली. परंपरा, रीती यांच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा धागा आहे, हे खरं. पण मला मात्र या गोष्टीमुळे आजीच्या गोष्टीतलं ते घर, डोंगर धूसर होतात की काय, असं वाटायला लागलं. खरं म्हणजे वाईटच वाटत होतं मला की आजीनं सांगितलेली गोष्ट खरी नाही तर!

परवा एका लग्नानिमित्त आम्ही बेळगावला गेलो होतो. आमचं गाव हडलगा/हडलगी तिथून जवळच होतं. त्यामुळे आजवर ज्यांनी ते गाव कधीच पाहिलं नाही अशी आमच्या पिढीतली मंडळी आणि सगळे मोठे मिळून त्या गावी गेलो. हे सगळं पाहून आजीची खूप आठवण झाली. कधीही न पाहिलेल्या पणजी-पणजोबांच्या आठवणींना तिथे उजाळा मिळाला. आई, काका, मावशी यांनी तिथल्या गोष्टी सांगितल्या. तिथलं ते घर, आजूबाजूचा परिसर पाहताना मनातल्या त्या गोष्टीवर साचलेलं धुकं आपोआप दूर झालं. आजच्या काळातही दुर्गम म्हणावं असं ते गाव आहे. तिथे देऊळ आहे, घर आहे.

तिथे गेल्यावर मी स्वतःला पुन्हा एकदा समजवलं, आजी सांगत होती तेच खऱं होतं. रीत वगैरे सब झूठ! किमान माझ्यासाठी तरी! माझ्या लहानपणीच्या ठेव्यामधली ती एक अमूल्य गोष्ट आहे, जिने मला आमच्या मूळ गावाशी बांधून ठेवलं आहे. त्यामुळे मी तरी तिला धक्का पोहोचू देणार नाही. तिथे जाऊन जे वाटलं ते शब्दातीत आहे. दिसायला सगळं नेहमीचंच होतं पण आमच्यातल्या प्रत्येकाला त्या जागेविषयी जे वाटतं होतं ते महत्त्वाचं होत. काहीजणांच्या आठवणी प्रत्यक्ष होत्या, तर आमच्यासारख्यांच्या ऐकीव. पण त्याच आठवणींच्या धाग्याने आम्हाला बांधून ठेवलं आहे, हे नक्की. काळाच्या ओघात गोष्टी नाहीशा होतात, आठवणी राहतात. पण अशा अमूर्त आठवणींमध्ये खूप मोठी ताकद असते, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा जाणवलं.

©तृप्ती कुलकर्णी

छायाचित्र गुगलच्या सौजन्याने

सोमवार, १० मे, २०२१

इडलीपुराण

 इडलीपुराण








रंगीत इडली, इडली फ्राय, मसाला इडली या इडलीच्या भाऊबंदांनी अजून तरी माझ्या लाडक्या पांढऱ्याशुभ्र, मऊसूत वाफळत्या इडलीची जागा पटकावलेली नाही आणि बहुतेक ते कधी शक्यही होणार नाही.