न खाल्लेल्या बामगोळ्याची गोष्ट!
आमची सोलापूरची शाळा हरिभाई देवकरण जगात वर्ल्डफेमस! या हरिभाईमधून बाहेर पडलेले आम्ही विद्यार्थी. चौथीनंतर नू.म.वि. च्या बाळबोध विहिरीतून आम्ही सगळे हरिभाईच्या महासागरात लोटले गेलो होतो. पहिल्या दिवशीच शाळेचं ते भलंमोठं मैदान…नाही दोन मैदानं, भल्यामोठ्या इमारती, प्रयोगशाळा, पाण्याची मोठी टाकी,
हा आमच्या शाळेसमोर उभ्या राहणाऱ्या सय्यद मस्तानीवाल्याचा बामगोळा. ज्याची चव मी उभ्या शालेय आयुष्यात कधीच चाखली नाही. का तर बाहेरचं खाणं निषिद्ध! त्यातून शाळेत असणारी मोठी भावंड कधी घरी जाऊन तक्रार करतील याचा नेम नाही. आणि या तक्रारींच्या कटु अनुभवचा दमदार ठसा पहिल्याच टर्ममध्ये पाठीशी नाही, तर पाठीवर उमटला होता. शाळेबाहेर मिळणाऱ्या पेरूच्या नादात पहिल्या सहामाहीचा गणिताचा पेपर मी अवघ्या तासाभरात उरकला होता. आणि आजींकडून मस्तपैकी पेरू घेऊन मोठ्या बहिणींचा पेपर संपण्याची वाट पाहत बसले होते. त्या परीक्षेचा निकाल लागल्यावर माझा जो काही निकाल लागला होता तो न सांगितलेलाच बरा!
पण तेव्हापासून शाळेच्या बाहेर मिळणाऱ्या या सगळ्या मेव्यापासून मी लांबच होते. पण शाळेत येताजाता त्या बामगोळ्याचे रंग पाहायला खूप आवडायचं मला. मोठं झाल्यावर मिनरल वॉटरच्या बर्फाचा बामगोळा खाल्ला खूप वेळा! पण तो खातानाही मनात सय्यदच्या गाडीवरचा तो बामगोळा होताच. आमच्या शाळेबाहेरच्या त्या सय्यद मस्तानीवाल्याचं निधन झालं, अशी बातमी वाचली आणि पुन्हा एकदा माझं मन तिथे त्याच्या गाडीसमोर जाऊन उभं राहिलं. त्या बामगोळ्याची चव कशी असेल, या प्रश्नाचं उत्तर आता कदाचित मिळणारही नाही. आता तिथे जाऊन तो बामगोळा खाल्ला, तरी त्या शाळकरी वयात जो आनंद, जी चव चाखायला मिळाली असती ती मात्र आता मिळणार नाही. आयुष्यातले अनुभवही असेच असतात ना! म्हणूनच ज्या वेळेस जे अनुभववासं वाटेल त्याचा आनंद घ्यावा. नाहीतर ती गोष्ट या न खाल्लेल्या बामगोळ्यासारखी कायम मनात राहते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा