शुक्रवार, १९ डिसेंबर, २०२५

 




सदाबहार स्मृतिगंध

मनोरंजन विश्वाच्या या जंजाळात कधीतरी अचानकच लॉटरी लागते. अपेक्षित माणसांकडूनही अनपेक्षित सुखद धक्के मिळतात. परवा युट्यूबवर सदाबहार नावाचा चित्रपट पाहिला. यात आपल्याकडच्या ज्येष्ठ मंडळींची अवस्था, त्यांचे प्रश्न या गोष्टी गजेंद्र अहिरेंनी कुशलपणे हाताळले आहेत आणि नितांतसुंदर चित्रपट बनवला आहे. खरंतर आधी संथ, दुःखद काही तरी आहे, असं वाटलं; पण जया बच्चन, राजेन्द्र गुप्ता आणि रजत कपूर अशी तगडी कास्टिंग पाहून सुरुवात केलीच मग थांबता आलंच नाही.

ही आहे निनीची गोष्ट. सध्या आपल्या आसपास दिसतात ना अगदी तंतोतंत तशीच ही एक आजी. मुलं परदेशी, नवरा पुढच्या प्रवासास निघून गेलेला, स्वतःची चाकोरी न सहजासहजी न सोडणारी ही निनी. हिचा जीव अडकलाय आहे अनेक वर्षांपूर्वी वडिलांनी भेट दिलेल्या रेडिओमध्ये. हिच्या घराचा दिवस उजाडतो तो या रेडिओच्या साथीनं आणि मावळतो तोही त्याच्याच आवाजानं. घरी सोबत म्हणून काम करणाऱ्या मुलीलाही या निनीच्या स्वभावाचा पुरेपूर अंदाज आला आहे. ती सगळं काही तिच्या कलानं घेते. निनीच्या मुलानं किल्लीवर चालणाऱ्या घडाळ्याचं रूपातंर बॅटरीवर चालणाऱ्या घडाळ्यात केल्याचं गुपितही शक्य होईतोवर लपवून ठेवते.

एक दिवस निनीचा हा लाडका रेडिओ बंद पडतो आणि तिच्या संथ, एकसुरी आयुष्यात एकाएकी खंड पडतो. ती प्रचंड अस्वस्थ होते. कधीकाळी बारा-तेरा वर्षांपूर्वी त्यांच्या नवऱ्यानं ज्यांच्याकडून रेडिओ दुरुस्त करून आणला होता त्या माणसाचा नंबर माळ्यावरच्या बॅगेत लपलेल्या डायरीतून शोधून काढते. त्याला फोन करते. इतकं सगळं होत असताना आपल्या मनात धाकधूक की आता तो माणूस, त्याचं दुकान यातलं काहीतरी शिल्लक असेल का...पण फोन उचलला जातो. पलीकडचा माणूस अत्यंत तटस्थपणे त्यांना रेडिओ दुकानात घेऊन यायला सांगतो. आपल्याला वाटतं,अरे बापरे, आता या कशा घेऊन जाणार ते रेडिओचं एवढं मोठं धूड?

पण नाही...आपली ही खमकी निनी मुंबईच्या कुठल्यातरी उपनगरातल्या गल्लीबोळातल्या त्या दुकानात जाऊन ठेपते. तिथे त्यांची गाठ पडते कस्तुरीमियाँशी. एक अवलिया जो ना फुलटाईम इंजिनिअर आहे ना फुलटाईम शायर. दोन्हीचं एक कमाल रसायन. त्यांना तो रेडिओ दुरुस्त केलेला आठवतोय, हे कळल्यावर आपल्या आजींना जरा बरं वाटतं. विश्वास वाटतो की आता काहीतरी होऊ शकेल या बंद पडलेल्या रेडिओचं. कस्तुरीमियाँचं जरा शायराना अंदाजातलं बोलणं, त्यांनी घेतलेल्या फिरक्या या सर्वाचा निनीवर काहीही परिणाम होत नाही. दिवस मावळत आल्यावरही रेडिओचं काही होत नाही, हे पाहून कस्तुरीमियांच्या रेडिओ दुकानातच ठेवण्याची विनंती धुडकावत त्या रेडिओ घेऊन आपलं घर गाठतात. पुन्हा दुसऱ्या दिवशी आख्खा रेडिओ उचलून दुकानात नेतात.

कस्तुरीमियाँ रेडिओला कुठली मात्रा लागू पडेल, हे रोज नव्यानं आजमावत असतात. या रेडिओदुरुस्तीच्या वाटेवर या दोघांनाही हळूहळू मैत्रीचं सुंदर नातं गवसतं. कधी चहाच्या पेल्याबरोबर, कधी सामोसे-जिलेब्यांचा आस्वाद घेत आणि कस्तुरीमियांच्या शायरीच्या साथीनं ते बहरंतही. समवयस्काशी मारलेल्या मनमोकळ्या, दिलखुलास गप्पा कशी जादूची कांडी फिरवतात, हे दिग्दर्शकानं खुबीनं दाखवलं आहे. निनीच्या व्यक्तिरेखेचा एका खमक्या हटवादी आजीपासून दिलखुलास दाद देणाऱ्या आजीपर्यंतचा प्रवास आपल्याला सुखावून जातो. रेडिओ दुरुस्त होईपर्यंत कस्तुरीमियांच्या दुकानात ठेवायला तयार होण्यापर्यंत ही मजल जाते.

ईदच्या दिवशी या. आमच्याबरोबर शीरखुर्मा खा आणि तुमचा रेडिओ घेऊन जा, असं कस्तुरीमिया निनीला सांगतात. दरम्यानच्या काळात छोटसं आजारपणं येऊन गेल्यावर ईदच्या दिवशी निनीला आठवतं की आपल्याला रेडिओ आणायला जायचं आहे. ती थेट जाऊन थडकते दुकानात. पाहते तर काय दुकान बंद. सैरभैर होऊन ती आसपास चौकशी करते, तेव्हा तिला कळतं की आजच ईदच्या दिवशी ते स्वर्गवासी झाले. हे ऐकून सुन्न होऊन ती घरी परत येते. एक माणूस गेल्यावरही आपल्याला मात्र रेडिओचीच काळजी होती, हे जाणवून तिला स्वतःचीच लाज वाटते.

पण थोड्या दिवसांनंतर तिला रेडिओचा विरह सहन होत नाही. पुन्हा त्या दुकानात जाऊन ती कस्तुरीमियांच्या मुलाच्या दुकानाचा पत्ता शोधून काढते. त्यांचा मुलगा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या एका चकचकीत मोठ्या दुकानाचा मालक आहे, हे कळल्यावर बसलेला आश्चर्याचा धक्का ती पचवते आणि माझा रेडिओ मला परत द्या, असं सांगते. पण रिकाम्या केलेल्या दुकानात तिचा रेडिओ नाही, हे कळल्यावर त्रागा करते. कस्तुरीमियांचा मुलगा मात्र तिला शांतपणे मी तुम्हाला तुमचा रेडिओ परत देईन असं आश्वासन देतो. दुकानातल्या नोकरांनी जुन्या रेडिओतले भाग विकून टाकल्यामुळे नवे भाग बसवून तयार केलेला रेडिओ निनी अवघ्या काही सेकंदात ओळखते आणि आपण चमकतो, हिचा रेडिओवर फक्त जीव नाहीये, तर त्याच्या कणाकणाशी ही जोडलेली आहे, हे आपल्याला कळतं.

मग पुढे कस्तुरीमियांचा मुलगा चोरबाजारात फिरून स्वतः त्या रेडिओचे भाग गोळा करतो. रात्रंदिवस खपून तो रेडिओ दुरुस्त करतो. ते करताना आपल्या गेलेल्या वडिलांशी त्याची नव्याने भेट होते. वडिलांच्या प्रेमापायी ते जाईपर्यंत जुन्यापान्या वस्तू पुन्हापुन्हा दुरुस्तीला पाठवत राहणारा आणि त्यांच्या कष्टाची शेवटची कमाई निनीकडून घेताना भावूक होणारा हा मुलगा आपल्याला एकदम आवडूनच जातो.

चित्रपटातील शेवटचा प्रसंग - निनीचं झोपेतून उठणं, नेहमीप्रमाणे रेडिओ लावणं, आवाज येत नाही म्हणून आवाज मोठा करणं आणि तिच्या मोलकरणीनं येऊन किती हा मोठा आवाज असं म्हणत आवाज लहान करणं. आजिबात वेगवान नसणाऱ्या चित्रपटातली ही दृश्यांची साखळी आपली उत्कंठा शिगेला पोहोचवते. हिला आत्ता ऐकू येईल की मग, या आशेने आपण पुढे पाहत राहतो. पण नाही...ज्या रेडिओच्या आवाजावर तिचा आनंद, शांतता अवलंबून असते तो तिला परत कधीच ऐकू येणार नसतो, हे आपल्याला कळतं. आता आपण रडणार एवढ्यात दारात एक माणूस कस्तुरीमियांनी तिच्यासाठी लिहिलेली चिठ्ठी घेऊन येतो. त्या चिठ्ठीचा आशय असा असतो –

मोहतरमा, मिट्टी कभी बासी नही होती।

उम्मीद की बारिशें ऐसा होने नही देती।

दुनिया तो बदलेगी जरूर, बदलते रेहना वक्त की फितरत है।

कल न ये रेडिओ होगा न इसका दुरुस्तगार मैं।

न सुननेवाले ये कान होगें।

मगर दिल पर जो आवाज शाया हो रखी है

वो कभी नही मिटेगी।

आपका रेडिओ बक्से में नही आपके दिल में साहिबा।

हम रहें ना रहे, मगर जिसे जी चुकें हम

वो मिश्री में घुले गीत रुहों में गुंजते रहेंगे हमेशा।

ही वाक्य ऐकून ना खेद ना खंत, ना आनंद काहीचं वाटलं नाही. पोचली ती या शब्दांमागची नेमकी भावना. गेले कित्येक दिवस लेखासाठी एक संदर्भ शोधत होते. ज्यात सूक्ष्म इंद्रिये म्हणजे काय वगैरची चर्चा करून आपल्या मनात घर करून राहिलेल्या गोष्टींविषयी लिहायचा विचार करत होते. पण काही केल्या लिहिलं जात नव्हतं माझ्याच्यानं. असं का होतंय हे कळत नव्हतं. पण मला जे सगळं सांगायचं होतं ते वरच्या या कवितेत येऊन गेलं. लहानपणापासून म्हणजे आपल्याला जेव्हापासूनचं आठवतं तेव्हापासून आपल्या स्मृतिपटलावर काही स्मृती कोरल्या गेलेल्या असतात. मग त्या शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध कशाच्याही असू शकतात. नेहमीच्या रस्त्यावरून जाताना एखाद्या वेलीवरच्या फुलांचा विशिष्ट वास, एखादा विशिष्ट आवाज, स्पर्श, दृश्य यांची आठवण. माझ्याकडे अशा खूप स्मृती आहेत. राघवेंद्र स्वामींच्या मठात दिलं जाणारं कापूर घातलेलं तीर्थ, भल्या पहाटे पूजेसाठी तगरीची फुलं तोडणारे माझे आजोबा, रामेश्वरमधल्या कुठल्याशा एका खानावळीत खाल्लेलं वेगळ्याचं चवीचं दही अशा अनेक गोष्टी आहेत. आपण त्या अनुभवलेल्या असतात. तसं तर आपण खूप काही अनुभवतो. पण काही गोष्टी मात्र आपली छाप सोडून जातात. तीच ती स्मृती – संस्कारमात्रजन्यज्ञानं स्मृतिः। अशी स्मृतीची व्याख्या केली जाते. मग हे संस्कार नेमके होतात कोणावर हा शास्त्रार्थाचा विषय आहे. पण आपल्याला आलेले अनुभव स्मृतिपटलावर स्थळ, काळ अशी बंधनं न जुमानता राहतात. कधीकधी यात अप्रिय स्मृतीही असतील. पण आपल्याला प्रिय असलेल्या वस्तूंशी संबंधित स्मृती या आपल्यात असतात, त्या वस्तूंमध्ये नाही. त्यामुळे काळाच्या ओघात हातून निसटलेल्या गोष्टींविषयी खंत न बाळगता त्यांचा स्मृतिगंध बाळगावा आणि आनंदात राहावं.

©तृप्ती कुलकर्णी

छायाचित्र –गुगलच्या सौजन्याने

ही पोस्ट आवडल्यास माझ्या नावासहित पुढे पाठवू शकता.

आणखी लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या व फॉलो करा.

कवितेच्या ओळी सदाबहार चित्रपटातील आहेत.

 

 

सोमवार, ३ नोव्हेंबर, २०२५

 न पाहिलेलं स्वप्न!


भारतीय महिला क्रिकेट संघानं विश्वचषक मिळवला. महिला क्रिकेटचं अनेक दशकांपासूनचं अपुरं स्वप्न पूर्ण केलं. आता या विजयामुळे महिला क्रिकेटची व्यावसायिक गणितं बदलतील, महिला क्रिकेटला नवी दिशा मिळेल. आपल्या संघातल्या सर्वच खेळाडूंची कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद अशीच आहे.
आता तुम्ही म्हणाल सगळं जग हेच सांगतंय. यात तुम्ही काय भर घालताय, नवीन काय सांगताय...तेच तेच काय वाचायचं सारखं. पण हे सामने सुरू झाल्यापासून आत खोलवर काहीतरी घडत होतं, कळत होतं पण वळत नव्हतं. याआधी महिला संघ विश्वचषक खेळला नाही, अटीतटीचे सामने खेळला नाही, असंही काही नव्हतं. पण यावेळेस बातच काही और होती. इतकी वर्ष उपेक्षा सोसलेल्या या संघावर अचानक संपूर्ण देशाच्या अपेक्षांचं ओझं लादलं गेलं आणि या पोरींनीही त्या अपेक्षा पुऱ्या केल्या, प्रतिस्पर्धींना पुरून उरल्या. मैदानांवर अत्यंत संयतपणे, डाव आखून खेळणाऱ्या या मुलींनी सामना जिंकल्यावर तितक्याच खुल्या दिलानं रडून विजयही साजरा केला. त्यांच्या खेळाला मिळालेल्या ग्लॅमरचं शिवधनुष्य पेलण्याची ताकदही त्यांच्यात आहे, हे त्यांनी त्यांच्या विजयोत्सवातून दाखवून दिलं.

हा विजयोत्सव पाहताना एखादं न सुटणारं गणित अचानक सुटावं तसं इतके दिवस काय खुपत होतं ते उमजून गेलं. क्रिकेटमधलं करिअर वगैरे गोष्टी खिजगणतीतही नसलेल्या आणि आयुष्यभर पुरुषांच्या क्रिकेटचे सामने पाहून त्यातचं खूश होणाऱ्या आमच्यासारख्या ‘बायकांना’... हो एके काळी जीव तोडून क्रिकेट खेळणाऱ्या आणि आता बायका कॅटेगरीत मोडणाऱ्या ‘आम्हा मुलींना’ या सामन्यांनी एक अनामिक समाधान दिलंय.

संध्याकाळी शाळेतून आल्यावर, सुट्टीच्या दिवशी, सोलापूरच्या मे महिन्याच्या दुपारी रणरणत्या उन्हात आमचं मानसमधलं (आमच्या बिल्डिंगमधलं) टोळकं खाली जमायचं. टीम पाडल्या जायच्या आणि “और ... ने अपना खाता खोला!!!” या राजेश काकांच्या वाक्याने आमची मॅच सुरू व्हायची आणि मग पुढे काय व्हायचं कळायचं नाही. रोज नव्यानं कळणारे नियम, बॉल इकडे गेला की फोर, अमुक एका भिंतीच्या पुढे गेला की २ रन वगैरे नियम तेव्हा जगन्मान्य आहेत, असचं वाटायचं. या मॅचवर आपलं आख्खं आयुष्य अवलंबून आहे, अशा पोटतिडकीनं, दातओठ खात मॅच खेळली जायची. भांडणं, रडारड, चिडाचिड सगळं व्हायचं. कधी मॅच अर्ध्यातच संपायची, कधी कुणी जिंकायचं तर कधी कोणी हरायचं. पण काही झालं तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळे तिथे हजर व्हायचे. 
तेव्हा आम्ही मुलं-मुली एकत्र खेळायचो. सुदैवानं आमच्या घरात तरी मुलींना काय करायचंय क्रिकेट वगैरे खेळून असलं काही ऐकावं लागलं नाही, कारण ‘जास्ती की मेजॉरिटी’ मुलींचीच होती. जरी क्रिकेटच्या बाबतीत जास्त प्रोत्साहन वगैरे दिलं गेलं नाही, तरी कधी कुणी आडकाठीही केली नाही. त्यामुळे मनसोक्त खेळायला मात्र मिळालं. खेळताना कळत गेलं की मुलगी म्हणून बॉलिंग करताना, बॅटिंग करताना आपला जोर कमी पडतो, मग ती उणीव भरून काढायची एक चटक लागली. आऊट व्हायचं नाही, वेगवेगळ्या पद्धतीने बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न करायचा आणि हे सगळं करताना शिकवणारे होते राजेश काका! आमचं आराध्यदैवत. ते म्हणतील ते प्रमाण असायचं आमच्यासाठी. त्यांनीच आम्हाला रोज शाळेतून आल्यावर नियमित व्यायाम करावा लागेल, हे सांगितलं. आमच्या कंपूमध्ये हरतऱ्हेचे नमुने होते. अतिशय हुशारीनं ते प्रत्येकासाठी वेगळा नियम बनवत. आमच्या घडणीच्या वर्षांमध्ये आम्हाला त्यांनी खूप काही दिलं. खरं तर त्यांना आमच्यासारख्या शाळकरी पोरांमध्ये रमण्याचं काही कारण नव्हतं, पण असतात अशी काही माणसं जी आपल्या आयुष्यावर खूप मोठी छाप पाडून जातात. 

तर कालचा महिलांच्या विश्वचषकाचा अंतिम सामना पाहिल्यावर आमचा क्रिकेटचा हा छोटासा प्रवास माझ्या डोळ्यांसमोरून तरळून गेला. त्या काळी छोट्या शहरांमध्ये मुलीच काय मुलांनीही क्रिकेटमध्ये करिअर करणं हे स्वप्नवतच होतं. जिथे मुलांची ही गत होती तिथे मुलींचा तर प्रश्नच उद्भवत नाही. पण आज भारतीय संघानं मिळवलेला हा विजय अशा छोट्या-छोट्या शहरांमधून आलेल्या मुलींनीच मिळवलेला आहे. अशा लहानमोठ्या गल्ल्यांमध्ये खेळणाऱ्या कितीतरी मुलींना आपण हे स्वप्न पाहू शकतो, याची जाणीवही नव्हती. पण तरीही त्या मुलांइतक्याच त्वेषाने खेळत असत. फक्त या खेळाच्या प्रेमापोटी. 

आता परिस्थिती बदलली आहे. अशा मुलींना आता योग्य दिशा मिळाली आहे, याचं समाधान आहे. जिथे मुलामुलींमध्ये भेदभाव केला जायचा तो कमी होईल. मुलींना योग्य संधी लाभतील. आता सगळ्याच खेळांकडे व्यावसायिक पातळीवरून पाहिलं जातयं. कोचिंग, ट्रेनिंग सगळ्या गोष्टी एकदम फोकसने होताहेत. ही चांगलीच गोष्ट आहे. महिला क्रिकेटचे ‘अच्छे दिन’ आता खूप मोठ्या प्रतीक्षेनंतर आणि आधीच्या टीमच्या तपश्चर्येनंतर सुरू होतील. 

हे सगळं ग्लॅमर फक्त क्रिकेटलाच का, बाकीच्या खेळांचं काय, हा प्रश्न तूर्तास तरी बाजूला ठेवूया. काही झालं तरी या खेळात आपल्या देशाला बांधून ठेवण्याचं सामर्थ्य आहे, हे मान्य करावचं लागेल. माझा नवरा काल मॅच संपल्यावर म्हणला,“या देशातल्या फक्त पुरुषांच्याच नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या नसांनसांतून क्रिकेट वाहतंय - मग ती स्त्री असो किंवा पुरुष!” कालच्या सामन्यानंतर स्टेडियममध्ये, संपूर्ण भारतात झालेल्या जल्लोषाने हेच सिद्ध झालंय. विश्वविजेत्या महिला संघाचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. त्यांनी अनेक मुलींच हे ‘न पाहिलेलं स्वप्नही’ पूर्ण केलंय, त्यांनी मेहनतीनं तयार केलेला हा विजयमार्ग फक्त क्रिकेटच नाही तर सर्व खेळांसाठी प्रेरणादायी ठरो. क्रिकेटसाठी कायमच भारतीयांची मनं कायमच म्हणतात,“दिल मांगे मोअर!”

©तृप्ती कुलकर्णी

छायाचित्र गुगलच्या सौजन्याने

ही पोस्ट आवडल्यास माझ्या नावासहित पुढे पाठवू शकता.

आणखी लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या व फॉलो करा.



मंगळवार, २५ मार्च, २०२५

 

मैदान



मला माहीत आहे मागच्या लेखात मी मला आवडलेल्या सिरीजविषयी लिहिणार आहे. त्याचीच तुम्ही वाट पाहत आहात. पण त्याआधी हा एक लेख वाटेत आडवा आला...थांबवू शकले नाही म्हणून पोस्ट करतेय. माफ करा.

परवा एका परीक्षेसाठी मुलाला दुसऱ्या एका शाळेत घेऊन गेले होते. शाळेत पहिलं पाऊल टाकल्यावर नजरेस पडलं ते भलंमोठं मैदान, तिथं मनसोक्त खेळणारी मुलं. अगदी हरखून गेले मी ते मैदान पाहून, थेट आमच्या हरिभाई शाळेच्या मैदानावर जाऊन थडकले. जगात शोधूनही आमच्या शाळेसारखं मैदान सापडणार नाही. एक नाही तर दोन-दोन मैदानं होती आमच्या शाळेला. एक खालचं अगदी विस्तीर्ण आणि दुसरं वरचं आखीवरेखीव, मऊसूत लाल मातीचं. पाचवीत नव्यानं या शाळेत आल्यानंतर पहिली सलामी दिली या मैदानानेच. शाळेच्या इमारतीच्या भव्यतेला या मैदानानं आपल्या कवेत सामावून घेतलं होतं.

पूर्वी मैदानी खेळ खेळण्यासाठी शक्यतो कुठले क्लास लावावे लागत नसत. त्यामुळे नवीन शाळेत आल्यावर या मैदानाशी गट्टी जमायला आजिबात वेळ लागला नाही. पाचवी ते दहावीच्या आठ तुकड्यांमधील जवळपास सर्व मुलामुलींना सामावून घेऊनही तिथे गर्दी झाली आहे, असं आजिबात वाटायचं नाही. सुट्टी होण्याआधी सगळ्यांचं लक्ष खिडकीतून दिसणाऱ्या मैदानाकडे लागलेलं असायचं. खरंतर दुपारच्या तळपत्या उन्हात चमकणाऱ्या त्या मैदानाकडे उघड्या डोळ्यांनी पाहणंही मुश्किल व्हायचं, पण डबा खाऊन झाल्यावर धावत जाऊन त्या मैदानाला भेटणं म्हणजे अभ्यासाच्या विचारांतून मिळणारा एक पॉवरब्रेक असायचा. आमची पॉरबँकच होती ती. आमच्याकडे दोन सुट्ट्या असायच्या एक छोटी व एक मोठी. मोठ्या सुट्टीत डबा वगैरे खाणं अपेक्षित असायचं. पण मुलं शक्यतो छोट्या सुट्टीतच डबा खाऊन मोकळी व्हायची आणि सुट्टी झाली रे झाली की वेगवेगळ्या गटातली मुलंमुली भराभर जागा पकडायला पळायची. लंगडीचा कट्टा, कबड्डीचं मैदान, डॉचब़ॉलची जागा...भराभर रुमाल टाकले जायचे या जागांवर आणि शाळा पुन्हा भरेपर्यंत खेळ चालायचा. अर्धवट रहिलेला डाव दुसऱ्या दिवशी पूर्ण करायचा. ऊंची वाढवण्याचा ध्यास घेतलेल्यांसाठी कडेला डबलबार, सिंगलबार होते. मैदानाच्या टोकाला व्यायामशाळा होती. जी थोडक्याच जणांना माहीत होती. काही मुलं जायची खरी तिथं. जी मुलं सगळ्यांमध्ये मिसळत नसत, सुरुवातीला थोडी एकटी राहत त्यांनाही हे मैदान मोठ्या मायेनं धीर द्यायचं. तिथल्या मोठ्यामोठ्या झाडांच्या सावलीत निवांत बसून खेळणाऱ्या मुलांकडे नुसतं पाहत राहण्यातही मजा होती. कधी खेळायचा मूड नसेल, तर दोन्ही मैदानांवर एक चक्कर जरी मारली, तरी सुट्टी संपायची. सुट्टी संपत आली की खालच्या मैदानावर भांडाराच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या टाकीवर गर्दी व्हायची. तिथलं पाणी पिऊन मोठी झालेली मुलं आता आयुष्याचं मैदान गाजवतायत. तेव्हा हायजिन वगैरेसारख्या कुठल्याही गोष्टीचा किंतु न बाळगता सरसकट सर्वजण ते पाणी प्यायचे.

मैदानाची खरी शोभा वाढायची ती शनिवारी सकाळी. पीटीचा तास, गणवेशातील विद्यार्थ्यांच्या रांगा, ढोलपथकाच्या तालावरची कवायत, सर्वांनी एका सुरात म्हटलेली गाणी, कौतुकसमारंभ, स्टेजवरची भाषणं... मैदानावर मातीत रांगेनं बसलेली मुलं, त्यांच्यावर नजर ठेवणारे वर्गशिक्षक. त्यांची नजर चुकवून रांगांमध्ये लपूनछपून चाललेल्या खोड्या यांच्यामुळे शनिवारी सकाळी एक चैतन्य संचारायचं त्या आख्ख्या परिसरात.

ही दोन्ही मैदानं खऱ्या अर्थानं जागती व्हायची ते हिवाळ्यात; शाळेची शान असणाऱ्या हिवाळी सामन्यांच्या वेळेस. अठ्ठ्याऐंशी तुकड्यांचे विविध खेळांचे सामने त्यावेळी आयोजित केले जायचे. फायनलपर्यंत कोणता वर्ग जाईल याची उत्सुकता ताणलेली असायची. प्रत्येकानं आपल्या वर्गासाठी ठोकलेल्या आरोळ्यांनी दणदणून जायचं ते मैदान! सामन्यात भाग घेणारे, न घेणारे सगळेच जण त्या उपक्रमाचा भाग असत. आजकालसारखे फक्त ‘पार्टिसिपंट्स’ आणि ‘त्यांचे पेरेंट्स’ येत नसत ‘स्पोर्ट्स डे’ला. तेव्हा पालक वगैरे शाळेत येण्याचा तर प्रश्नच नव्हता. भले तुम्ही सामन्यात असा किंवा नसा आपल्या वर्गाला सपोर्ट करणं, हे त्या दिवसांमधलं राष्ट्रीय कर्तव्यच होतं. एरवी वर्षभर एकमेकांशी भांडणाऱ्या मुलामुलींमध्ये त्याकाळात मात्र एकजूट होत असे. शाळेच्या कंपाऊंडला लागून उभ्या असलेल्या काकाकंडून घेतलेला पेप्सीकोला खात सामने बघताना अभ्यास, परीक्षा, उज्ज्वल भविष्य वगैरेसारख्या क्षुल्लक गोष्टींची पुसटशीही आठवण राहत नसे. आता मोठं झाल्यावर या सामन्यांचं नियोजन करणाऱ्या शिक्षकांविषयी खरंच आदर वाटतो. कसं मॅनेज करत असतील देवच जाणे.

तर असं हे मैदान! ते कोणाच्याही शाळेचं असू शकतं. लहानपणी रुजलेली मैत्री, भांडणं, समेट, शिक्षा म्हणून मारलेल्या चकरा, वाढत्या वयातली गुपितं यांची साक्ष असणारं. तुमच्या-आमच्या सर्वांच्या भावविश्वाचा एक कायम आनंदी असणारा कोपरा या मैदानानं दिलाय आपल्याला. आपणही असाच एक कोपरा कायम जपून ठेवायला हवा, जो कोणत्याही आडकाठीशिवाय सर्वांना आपलंसं करेल.


©तृप्ती कुलकर्णी

छायाचित्र गुगलच्या सौजन्याने

ही पोस्ट आवडल्यास माझ्या नावासहित पुढे पाठवू शकता.

आणखी लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या व फॉलो करा.

 

सोमवार, २४ मार्च, २०२५

 

नियमांचं कोंदण!

कोणे एके काळी भासानं ‘स्वप्नवासवदत्तम्’ नाटकामध्ये स्वप्नप्रसंग रचला. त्यात राजा उदयनाच्या स्वप्नात आलेली वासवदत्ता आणि रंगमंचावरील प्रत्यक्षातील वासवदत्ता यांचा अद्भुत ताळमेळ साधून त्याने सुंदर स्वप्नप्रसंग रचला. भासाची ही कलाकृती अजरामर झाली. त्यातील स्वप्नप्रसंग हे एक नितांतसुंदर काव्यच आहे. पण याच स्वप्नप्रसंगात राजा उदयनाला रंगमंचावर निद्राधीन दाखवण्यात आल्यामुळे या नाटकावर आक्षेप घेतले गेले. कारण भासानं नाट्यशास्त्राच्या नियमांचं पालन केलं नाही म्हणे! रंगमंचावर निद्रा, युद्ध असे प्रसंग शक्यतो दाखवू नयेत, हा तो नियम. भासाने त्याच्या नाटकांमध्ये असे अनेक नियम मोडले म्हणा!  पण काळाच्या मोजपट्टीवर भासाचा काळ हा भरतमुनींच्या आधीचा दाखवल्यामुळे नाट्यशास्त्राचे नियम भासाला लागू होत नाहीत, असा युक्तिवाद करण्यात येतो.

भासाने त्याच्या काळी लागू नसलेल्या अनेक नियमांचं उल्लंघन केलंच! त्यातूनच तर भासनाटकचक्रातील तेरा वैविध्यपूर्ण नाटकं जन्माला आली. पण आजच्या या लेखात मला वेगळंच काही म्हणायचं आहे. आजकालच्या दृक्‌श्राव्य कलाकृतींमध्ये वापरण्यात आलेले ‘रस आणि रसनिष्पती’ याबद्दल थोडं बोलायचं आहे. मला माहीत आहे, हा लेख थोडा ‘वरातीमागून घोडे’ वर्गात मोडणारा आहे. पण लिहिताना ‘खूप लिहावं लागेल’ म्हणून केलेला कंटाळा भोवला, बाकी काही नाही.

तर, आजकालचे चित्रपट, ओटीटी यांच्यामध्ये दिसणारा प्रमुख रस म्हणजे ‘बीभत्स’ ज्याचा मूळ भाव आहे ‘जुगुप्सा’ म्हणजे एखाद्या गोष्टीविषयीची ‘किळस’. एखादी गोष्ट पडद्यावर दाखवताना त्या रसाचा कडेलोट केला, तरच आपल्या जन्माचे सार्थक होणार आहे, अशा आविर्भावात पडद्यावर सर्वकाही योजलेलं दिसतं.  आणि या कडेलोटाचा अंतिम परिणाम म्हणजे जुगुप्सा.

उदा. पूर्वी दोन सूर्यफुलांच्या आड होणाऱ्या शृंगाराचा आता होणारा कडेलोट, पूर्वी बंदुकीच्या गोळीच्या आवाजाने सूचित केलेल्या मुत्यूऐवजी एखाद्याच्या मेंदूला भेदणारं दृश्य, उडवलेलं मुंडकं आणि धड यांचं वेगळं होणं यातला वीररस, गरिबीच्या प्रदर्शनातून जाणूनबुजून मांडलेला कारुण्याचा बाजार, तंत्रज्ञानाच्या कृपेने चाललेली अद्भुताची लयलूट. स्टँडअप कॉमेडी वगैरेमधून होणाऱ्या हास्याच्या लयलुटीची कथा सर्वज्ञातच आहे, त्याबद्दल जास्त न बोललेलंच बरं. रौद्र, भयानक आणि बीभत्स तर एकमेकांचे पक्के साथीदार झाले आहेत. या संदर्भात शांत रसाविषयी फार काही न बोलणं बरं.

आजच्या या ओटीटी कंटेटला स्वातंत्र्याच्या नावाखाली कसलाच धरबंद उरलेला नाही. यांनी लोकांची ज्ञानेंद्रिये पूर्णपणे बधिर करण्याचा विडाच उचलला आहे जणू! त्यामुळे सतत काहीतरी नवे पाहण्याचा, ऐकण्याचा, अनुभवण्याचा नाद असलेली माझ्यासारखी माणसं एखादा एपिसोड पाहून कंटाळून जातात. या लोकाचं धक्कातंत्रही आता पुरातन झालं आहे.

चित्रपटगृहात सर्व गोष्टी दाखवता येत नाहीत. ओटीटीवर एक अस्वीकरण - डिस्क्लेमर टाकून काहीही दाखवलं तरी चालतं, हा ट्रेंडच आहे सध्याचा. भासाने जरी नियमांचं उल्लंघन केलं तरी त्यातून त्यानं रसनिष्पत्ती साधली आहे. आपल्या प्रेक्षकांना आनंद दिला आहे. अलीकडे आजकालच्या या सिरीजना नियमांचं कुंपण असावं, असं वाटू लागलंय. सूचक घटकांमधून प्रेक्षकांपर्यंत भावना पोहोचवण्यासाठी मोठी ताकद लागते. कदाचित काही नियम लागू केले तर ती प्रतिभा पुन्हा जागी होईल. रसांच्या परिपोषाला हातभार लागेल.

चुकीच्या गोष्टींचं गौरवीकरण करणं, प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजू दाखवून उदात्तीकरण करणं, या गोष्टी तरी उणावतील. या वेबसिरीज पाहून समाजात बळावणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल. या गोष्टीस अपवाद आहेतच. काही उत्कृष्ट कंटेंटही या ओटीटींच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहे. पण जे सातत्याने दाखवलं जात आहे, मांडलं जात आहे, तेच योग्य आहे, अशी भावना बळावत चालली आहे. त्यासाठी या ओटीटीचा वापर प्रेक्षक म्हणून विवेकानं करणं गरजेचं  आहे. तरच या गोष्टी नियमित होतील.

कुपी उघडी राहिली तर अत्तराच्या कुपीतला सुगंध उडून जातो, तसंच या खुल्या मनोरंजनामुळे त्यातला आनंदही नष्ट होईल की काय, अशी भीती वाटू लागली आहे. मागे एकदा मीच कधीतरी कुठल्याशा लेखात फुशारकी मारत म्हटलं होतं, ‘नियम हे मोडण्यासाठीच असतात’. पण हे नियम भासासारख्या पात्र माणसांनीच मोडण्याचाही एक नियम आणावा लागेल, असं आता वाटतंय.

पुढील काही लेखांमध्ये अतिरेक न करता रसनिष्पत्तीचा अनुभव देणाऱ्या माझ्या काही आवडत्या सिरीजविषयी लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे.

 ©तृप्ती कुलकर्णी

 

 

मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२५

 

‘हयग्रीव’ एक गूढ प्रवास







लॉकडाऊनच्या काळात ‘मायमिरर पब्लिशिंग हाऊस’ने ‘किताबकल्हई’ उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमांतर्गत त्यांनी काही जुन्या पुस्तकांचे प्रकाशन केलं. त्यातच रामचंद्र सखाराम गुप्ते यांचं ‘सूपशास्त्र’ (स्वयंपाक शास्त्र) हे पुस्तक होतं. त्याची जाहिरात पाहताच मी ते उत्साहात मागवून घेतलं, चाळलं. पण लॉकडाऊनच्या धामधुमीत पूर्ण वाचणं काही झालं नाही. आज सहजच हाताशी आलेलं हे पुस्तक चाळताना मला लॉटरी लागली, अनेक वर्षं पडलेल्या एका कोड्याचं उत्तर मिळालं. आता तुम्ही म्हणाल नमनाला घडाभर तेल नको...पुढे चला...

तर, आमचं गाव सोलापूर अंद्रऽऽ कर्नाटक – महाराष्ट्राच्या सीमेवरचं गाव. घरातलं वातावरण, खाद्यसंस्कृती यांवर थोडाबहुत कानडी पगडा होता आणि म्हणायला गेलं तर विजापूरच्या अगदी थोडसं पुढं असणारं तोरवी नावाचं गाव, तिथला नरसिंह आमचं कुलदैवत. वर्षा- दोन वर्षांतून तिकडे गेलो की तिथलं पूर्ण कानडी वातावरण अनुभवायला मिळायचं. मुघलांच्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी मोगल शैलीत बांधलेलं हे मंदिर, तिथल्या अंधारगुडूप भुयारातून “हादी...हादी...” म्हणजे वाट द्या अशी मजेत हाळी देत गाभाऱ्यापर्यंत जाऊन दर्शन घेतलं की ओढ लागायची वरच्या स्वयंपाकघरातून येणाऱ्या सुवासाची. तिथे बरेच पदार्थ असायचे. कर्नाटकी हुळीअन्ना, कोसंबरी, विविध चटण्या, कायरस आणि अजून बरंच काय काय...फक्त पोळी सोडून बरं का...या सगळ्यात माझ्यासाठी प्रमुख आकर्षण असायचा तो म्हणजे ‘हयग्रीव’. तिथे पंगतीत ऐकताना “हैग्रीवऽऽ हैग्रीवऽऽ” असंच ऐकू यायचं. मोठं झाल्यावर कळलं तो शब्द आहे हयग्रीव. मग तर त्या पदार्थामागचा गूढ अर्थ अनेक वर्ष उकललाच नाही, पण त्याची आवड मात्र कायम राहिली. तर संस्कृतात ‘हय’ म्हणजे घोडा आणि ‘ग्रीवा’ म्हणजे मान. थोडक्यात घोड्याचे शिर आणि माणसाचे शरीर असणारा. हयग्रीव हा विष्णुच्या अवतारांपैकी एक अवतार. पुढे एकदा प्रवासात कर्नाटकातल्या एका मोठ्या घाटातून प्रवास करताना मोठ्यांनी एके ठिकाणी थांबून आम्हाला दरीतलं एक गाव दाखवलं आणि सांगितलं त्या गावाचं नाव हयग्रीव –कारण त्याचा आकार घोड्याच्या डोक्यासारखा आहे. तेव्हा तो आकार दिसला नाही तरी आम्ही बापड्यांनी “हो खरंच कीऽ” वगैरे म्हणून वेळ मारून नेली होती.

तर हयग्रीव शब्दाचा अर्थ आणि माझा लाडक्याच्या पदार्थाचं नाव याची काही केल्या उकल होत नव्हती. पण सूपशास्त्र या पुस्तकात मला ‘हरभऱ्यांचे डाळीची क्षीर’ हा पदार्थ दिसला आणि मी थबकले. पाककृतीच्या तपशीलात आता शिरत नाही. पण हयग्रीव म्हणजे हरभरा डाळ, गूळ, खसखस, सुक्या खोबऱ्याचे, काजू-बदामाचे मुबलक प्रमाणात काप आणि भरपूर तूप. यात काही ठिकाणी दूधही घालतात. हा पदार्थ पुरणासारखा घोटून एकजीव करत नाहीत, तर त्यात प्रत्येक घटक स्वतंत्रपणे दिसावा लागतो. तूपात खरपूस तळलेले काजूचे-खोबऱ्याचे काप दाताखाली यावे लागतात, तरच खरी मजा.

तर या पदार्थाच्या नावाची दंतकथा अशी की, वादिराजतीर्थ नावाचा एक भक्त रोज हयग्रीवस्तोत्राचं पठण करून हयग्रीवाला या पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा.  एक दिवस देव शुभ्र घोड्याच्या रूपात प्रकट झाला आणि तो नैवेद्य त्याने ग्रहण केला म्हणून या पदार्थाला नाव पडले हयग्रीव. कर्नाटक, तेलंगणा प्रांतात हा पदार्थ आजही सणासुदीला नैवेद्य म्हणून केला जातो.

ही दंतकथा या पदार्थाशी कशी जोडली गेली असेल, या गोष्टींचा सारासार विचार मी बाजूला सारला आणि हयग्रीव या नावामागच्या गोष्टीला एकदम मान्यताच देऊन टाकली. कारण एखाद्या गोष्टीचा आपण कितीतरी वर्षं कळतनकळत विचार करत असतो आणि असं अनाहूतपणे मिळालेलं उत्तर आपल्या मनालाच नाही तर बुद्धीलाही सुखावून जातं. काही जणांना ही कथा माहीत असेलही. पण मला तरी ही कथा नव्याने गवसली आहे आणि माझ्या लाडक्या हयग्रीवाभोवतीचं गूढ वलय तिनं तात्पुरत का होईना दूर केलं आहे.


©तृप्ती कुलकर्णी

छायाचित्र –गुगलच्या सौजन्याने

ही पोस्ट आवडल्यास माझ्या नावासहित पुढे पाठवू शकता.

आणखी लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या व फॉलो करा.

 

 

बुधवार, ८ जानेवारी, २०२५

 

शोध स्त्री संताचा!


 

परवा सहजच इयत्ता चौथीचं इतिहासाचं पुस्तक चाळत होते. आम्ही ते पुस्तक रद्दीत न टाकता खास जपून ठेवलं आहे. या पुस्तकाशी खूप साऱ्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. इतिहासाशी आत्मीयतेचं नातं जोडण्यासाठी हेच पुस्तक कारणीभूत ठरलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यातल्या सनसनावळ्या, ते झपाटलेपण सगळं काही आठवून गेलं. पण थोडी खंत वाटली ती त्या पुस्तकातला दुसरा धडा पाहून! तोही अगदी जसाचा तसाच आहे. अगदी आमच्यावेळेस ३५ वर्षांपूर्वी होता तसाच. फक्त आता मी ते पुस्तक इंग्रजीमध्ये वाचत होते, इतकाच काय तो फरक. या धड्यामध्ये वारकरी संप्रदाय, महाराष्ट्रातील संतपरंपरा त्यांची शिकवण यांची माहिती आहे. यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, चक्रधर स्वामी, रामदास स्वामी यांची माहिती, त्यांची शिकवण, त्यांचे ग्रंथ यांची माहिती आहे. हे तर उत्तम आहेच. पण त्याकाळी खटकली नव्हती ती गोष्ट आता खटकली ती म्हणजे या धड्यात एकाही स्त्री संताचा उल्लेख नाही, त्यांच्या कृतींची, इतिहासाची माहिती नाही.

इतिहासामध्येसुद्धा महिला संत, त्यांच्या साहित्यकृती कायम उपेक्षितच आहेत. ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ म्हणणाऱ्या मुक्ताबाईंच्या ताटीच्या अभंगांचा गर्भितार्थ, बहिणाबाईंच्या चिंतनपर तरीही सहजसुंदर कविता, कान्होपात्रेच्या अभंगातील वेदना, कळवळा, वेणास्वामींची रामकथा यांचा परिचय नाही, पण किमान उल्लेख तरी करणं गरजेचं आहे.

मला इथे स्त्रीमुक्ती, स्त्रीपुरुष समानता यांपैकी कशाचाही डंका वाजवायचा नाही, पण ज्याप्रकारे पुरुष संतांनी त्यांच्या आयुष्यातील खडतर प्रसंगाना तोंड देत आपल्या आराध्याची उपासना केली त्याचप्रकारे किंवा त्याहीपेक्षा जास्त खडतर परीक्षेला सामोरे जात वेळप्रसंगी सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडत स्त्री संतानी आपल्या आराध्याची भक्ती केली. दैनंदिन कामं करत आपल्या आराध्याचं नाव मुखी असणाऱ्या या संतांनी कर्मयोग आणि भक्तियोगाची जणू सांगडच घातली.

लहानपणी दूरदर्शनवर प्रादेशिक चित्रपट लागायचे. तेव्हा अक्कमहादेवींवरचा एक कानडी चित्रपट पाहिला होता मी. त्या चित्रपटाचा पगडा मनावरून अजूनही दूर झालेला नाही. तेव्हा त्यांच्याविषयी वाचण्याची खूप इच्छा होती, पण दुर्दैवाने तेव्हा तसं काही वाचायला मिळालं नाही. पण २०२३ साली अरुणा ढेरेंचं ‘भारतीय विरागिनी’ हे पुस्तक प्रकाशित झालं आणि मला हरवलेलं काहीतरी गवसल्यासारखं वाटलं. आपल्या आवडत्या विषयावर आपल्या आवडत्या लेखिकेनं लिहावं, यापेक्षा आणखी काय हवं. या पुस्तकात मला अक्कमहादेवी तर भेटल्याच, शिवाय संपूर्ण भारतातील विविध कालखंडातील विरागिनी भेटल्या, त्यांचा परिचय झाला.

सावित्रीच्या लेकींचा उदय होण्याआधीही आपल्याकडे ही धडपड सुरू होती. समर्थ रामदासांसारख्यांनी या वेणाबाईंना वेणास्वामी ही उपाधी बहाल करून उभ्याने कीर्तन करण्याचा अधिकार दिला, त्यांच्यावर मिरजेच्या मठाची जबाबदारी सोपवली. या धडपडीला किमान काही प्रमाणात का होईना सार्थ केले. स्त्रीपुरुष समानतेच्याही पलीकडे जाऊन मला स्त्री, पुरुष, लहान मुले यांच्याकडे एकाच दृष्टीने पाहण्याची बुद्धी दे, अशी विनंती करणाऱ्या तुकाराम महाराजांच्या ‘नर नारी बाळें अवघा नारायण । ऐसें माझे मन करीं देवा ।।१।।’ या अभंगाप्रमाणे सगळ्या भेदांच्या पार जाण्याचा विचार व्यक्त केला, ही किती मोठी गोष्ट आहे!

 तर मूळ विषयाशी पुन्हा येताना असं म्हणावसं वाटतं की, लहान मुलांना जरी स्त्रियांच्या आयुष्यातील समस्या, त्यांवर मात करून त्यांनी मिळवलेलं संतपद यांचा खरा अर्थ आत्ता कळला नाही, तरी किमान त्यांचा उल्लेख आणि थोडक्यात परिचय करून द्यायला काय हरकत आहे?  त्यातून त्यांना महिला संतही होत्या हे तरी कळेल.

©तृप्ती कुलकर्णी

छायाचित्र –गुगलच्या सौजन्याने

ही पोस्ट आवडल्यास माझ्या नावासहित पुढे पाठवू शकता.

आणखी लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या व फॉलो करा.

 

 

गुरुवार, २ जानेवारी, २०२५

 

सोलापूरचा बैलबाजार आणि आम्ही!




लहानपणी डिसेंबर, जानेवारी म्हटलं की आमच्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारत असे. त्याचं कारण म्हणजे जानेवारी महिन्यात सोलापूरचं ग्रामदैवत श्रीसिद्धेश्वर महाराजांच्या उत्सवात भरणारी गड्ड्याची जत्रा. होम मैदानावर भरणारी ही जत्रा म्हणजे येक नंबरची जत्राच! मोठ्या मैदानावर उभारलेले तंबू, वेगवेगळे पाळणे, मौत का कुआ, आरश्यांची गंमत दाखवणारं दालन, पन्नालाल गाढवाचे खेळ, खाण्यापिण्याचे स्टॉल्स सगळं काही असायचं. हे होम मैदान आमच्या हरिभाई शाळेच्या समोरच असल्यामुळे आम्हाला दिवसाही पहायला मिळायचं हे सगळं. दिवसा सुस्तावलेलं हे मैदान रात्री कात टाकून उत्साहाची, चैतन्याची, रोषणाईच्या झगमगाटाची झूल पांघरून मनोरंजनासाठी सज्ज व्हायचं. घरातल्या मोठ्यांच्या मागे लागून आम्हीपण एक दिवस गड्ड्यावर जाऊन यायचो. कधी नव्हे ते तिथे मिळणारा भाग्यश्रीचा वडा खायला मिळायचा, दूध पंढरीचं सुगंधी दूधही मिळायचं. वर्षभराच्या आठवणी घेऊन आम्ही परत यायचो.

पण या गड्ड्याबरोबरच आमच्यासाठी खास होते ते म्हणजे डिसेंबर महिन्यातले शेवटच्या आठवड्यातील मंगळवार व शुक्रवार आणि संक्रातीपर्यंतचे सगळेच दिवस. आमच्या घराच्या अगदी समोर रेवणसिद्धेश्वर मंदिरासमोरच्या मैदानात भरायचा जनावरांचा बाजार!  डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मंगळवारी सकाळी सकाळी धुकं असताना काही टेम्पो येऊन थांबायचे, त्यातून म्हशी, बैल, शेळ्या उतरवल्या जायच्या आणि मग संध्याकाळी हा एक दिवसाचा बाजार संपायचा. आम्हाला थोडं वाईट वाटायचं. हे असं दोन आठवडे चालायचं. मग जानेवारी सुरू झाल्यावर ही सगळी मंडळी मुक्कामी यायची. दगडांची चौकट रचून विक्रेते आपापल्या सीमा आखून जायचे. मग तिथं आपापली जनावरं घेऊन यायचे. हळूहळू मैदानावरची जमीन दिसेनाशी व्हायची. सगळीकडे फक्त जनावरं दिसायची. रस्त्यावरून चालणं मुश्किल होऊन जायचं. सोलापूरची आणखी एक मजा म्हणजे आम्हाला ख्रिसमस व्हेकेशन नसायची तर ‘गड्ड्याची सुट्टी’ असायची तीही सात दिवस. मग काय आम्ही आणि तो बैलांचा बाजार एवढंच काय ते आमचं विश्व असायचं.

सकाळी उठल्यापासून गॅलरीमधून लांबपर्यंत पसरलेले ते बैल पाहत दिवस सुरू व्हायचा आणि तिथे आलेल्या विक्रेत्यांच्या मनोरंजानासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांच्या आवाजाने तो संपायचा. देवळात सिनेमे दाखवले जायचे, लावणी असायची, गाणी असायची. झोपताना आम्ही हे सगळं ऐकत बसायचो किती तरी वेळ...हो ऐकतच कारण तिथे जायची काही सोय नव्हती. सकाळी आंघोळ आटोपून, अभ्यास उरकून आम्ही खाली पळायचो. मग त्या बाजारातून धिटाईने एक फेरफटका मारायचो. आम्हाला आवडलेल्या उंच्यापुऱ्या बैलांची नावं विचारायचो तिथल्या काकांना. तेव्हा किंमत वगैरे विचारण्याएवढे शहाणे नव्हतो. मग रोज तोच एक उद्योग असायचा आपल्या आवडीचा बैल विकला गेला की नाही हे पाहायचं. आपला बैल विकला गेला की आनंद तर व्हायचाच, पण दुःखही व्हायचं की बाकीच्यांचे आहेत अजून  आपलाच विकला गेला. मग परत दुसरा आवडता बैल शोधायचा. जनावर विकलं गेल्यावर त्याच्या अंगावर झूल चढवायचे, त्याच्या शिंगांना गोंडे बांधायचे. त्याची मिरवणूक काढून देवळासमोर आणून उभं करत आणि तिथे वाकून त्याला नमस्कार करायला लावत. त्यामुळे वाजंत्रीचा आवाज आला की आम्हाला कळायचं की आता बैल विकला गेला. मग ती मिरवणूक पाहायला आम्ही लगेच हजर व्हायचो. जत्रेतून फिरणाऱ्या चंद्रतारा बिडीची जाहिरात आम्हालाही पाठ व्हायची...“तूतूतूतूतारा....चंद्रतारा बिडी ओढा!” घरच्यांच्या कटाक्षांकडे दुर्लक्ष करून आम्ही त्या जाहिरातीची बेधडक री ओढायचो.

 दूरच्या कोपऱ्यात म्हशी असायच्या. मग तिथे जाऊन चिकाचं दूध आणायचं, त्याचा खरवस व्हायचा. हे सगळं करताना हे बैल, म्हशी, गायी हेच आमचं विश्व होऊन जायचे. सकाळी सहा वाजता अंधारात तिथल्या बैलांच्या गळ्यात बांधलेला घंटांचा आवाज, विझत जाणाऱ्या शेकोटीतून निघणारा धूर, तिथे मुक्कामी असणाऱ्या लोकांचा गप्पांचा फड हे सगळं अनुभवत शिकवणीला जायचे मी. तिथल्या स्टॉल्सवर उकळणाऱ्या चहाचा वास, तळलेल्या भज्यांचा वास, हे सगळं काही औरच होतं. थोडी रमतगमत, ही मजा अनुभवत जायचे. आईनं बाजारातून सामान आणायला सांगितल्यावर या बैलांमधूनच वाट काढून जावं लागायचं. गावातल्या जीवनशैलीची सवय नसलेल्या आम्हाला सुरुवातीला थोडी भीती वाटायची या बैलांची, त्यांच्या मोठ्या-मोठ्या शिंगांची. पण तिथले काका सांगायचे,“ काही नाही करत तो. जा बिनधास्त.” मग भीती कमी व्हायची. बिनधास्त चालत, सायकलवर बैलांच्या गर्दीतून वाट काढत जायचो मग.

एरवीच्या शहरी जीवनात काही दिवस का होईना ग्रामीण जीवनाची एक झलक पाहायला मिळायची. आमच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये आपली शिदोरी उघडून बसणारी, तीन दगडांची चूल मांडून काहीतरी खायला बनवणारी ती माणसं, गायी, म्हशी आणि बैलांचे ते आवाज, त्यांची ती गर्दी यामुळे आम्ही एका वेगळ्याच जगात वावरायचो. मित्रमैत्रीणींमध्ये फुशारक्या मारायचो,‘आमच्या बिल्डिंगसमोर ना एवढा मोठा बैल आहे यावर्षी...’ खरंतर काही संबंध नसायचा या सगळ्याचा आमच्याशी. पण त्या तेवढ्या मोठ्या पसाऱ्यात आम्ही सगळी चिरकुट मुलं आपण किती भारी आहोत आपल्याला हे सगळं पाहता येतंय, या मिजाशीत वावरायचो. आता कळतंय की हे सगळं आम्ही अनुभवलं, मनात साठवलं, मुक्तपणे त्या बाजारात वावरलो हे आमचं नशीब होतं. खूप मोठ्या आर्थिक उलाढालीचं केंद्र असणाऱ्या  त्या बाजाराचं स्वरूप आमच्यासाठी मात्र वेगळंच होतं. तिथली आर्थिक गणितं आमच्या गावीही नव्हती.  संक्रातीनंतर हळूहळू बाजार संपत यायचा. सुरुवातीचा जोर उतरायचा, जनावरं विकली जायची, विक्रेते मुक्काम हलवायचे. शाळेतून त्या रिकाम्या रस्त्यावरून येताना नकळत आवंढा गिळला जायचा आणि मनाची समजूत घालायचो पुढल्या वर्षी आहेच की परत हे सगळं... आता तो बाजार भरत नाही तितक्या उत्साहात, तितकी गर्दीही नसते तिथे. पण तो बाजार आजही आम्हा सगळ्या मुलांच्या मनात तसाच आहे, याची खात्री आहे मला.

©तृप्ती कुलकर्णी

छायाचित्र गुगलच्या सौजन्याने

मंगळवार, १७ डिसेंबर, २०२४

 

‘द चिल्ड्रन्स ट्रेन’ - एक सुखद अपेक्षाभंग!




 

कुठलेही  युद्ध आणि त्याच्या अवतीभवती फिरणारे कथानक ज्यात लहान मुले, ट्रेन अशा गोष्टी असतील, अशा चित्रपटांची जरा भीतीच वाटते. कारण युद्धकाळातील सर्व परिणामांचा लेखाजोखा अशा कलाकृतींमध्ये घेतलेला असतो, ज्याची परिणती शक्यतो करुणरसात होते. पण याचा अर्थ असा नाही की मी असे चित्रपट पाहत नाही. पण सुरुवात करताना मनात एक किंतु असतोच. पण या किंतुला, किमान माझ्या या समजुतीला छेद देणारा एक चित्रपट परवा पाहण्यात आला. ‘Il treno dei bambiniया २०२४ मध्ये रिलीज झालेल्या इटालियन चित्रपटाची इंग्रजी आवृत्ती ‘The Children's Train पाहण्यात आली. व्हायोला अर्दोने यांच्या कादंबरीवर आधारित या चित्रपटाचं कथानक दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडातील आहे. साधारणपणे १९४3 -४६ मध्ये घडणाऱ्या घटनांवर आधारित हा चित्रपट.

या चित्रपटाची गोष्ट घडते ती दक्षिण आणि उत्तर इटलीतील नेपल्स आणि मोडेना या शहरांमध्ये. नेपल्सला १९४३ साली स्वातंत्र्य मिळाले पण १९४५ पर्यंत मुसोलिनीच्या हुकुमशाहीमधून सुटका होण्यासाठी मात्र त्यांना १९४५ पर्यंत वाट पाहावी लागली. त्या दरम्यान तिथली आर्थिक, सामाजिक, राजकीय व्यवस्था अक्षरशः कोलमडली होती. महागाई, बेरोजगारी, गरिबी अशा अनेक संकटाना हा देश सामोरा जात होता. त्यामुळे तिथल्या लहान मुलांच्या आयुष्यावर या सर्व घटकांचे खूप गंभीर परिणाम झाले. दैनंदिन जीवनातील सोयीसुविधांचा अभाव, अनारोग्य, कुपोषण यांचा सामना करत तिथली मुलं जगत होती. पालकांना आपल्या मुलांना रोजंदारीला लावावे लागत होते. अशात या मुलांसाठी उत्तर इटलीतील साम्यवादी पक्षाच्या महिलांच्या फळीने मायेचा हात पुढे केला. त्यांनी या मुलांसाठी ‘हॅपीनेस ट्रेन’ हा उपक्रम सुरू केला. उत्तर इटलीतील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वातावरण हे दक्षिणेच्या मानाने खूपच चांगले होते. युद्धाची झळ बसलेल्या दक्षिणेतील मुलांना उत्तर इटलीतल्या घरांमध्ये काही काळासाठी ठेवून घेणे, त्यांचे संगोपन करणे हा या उपक्रमाचा हेतू होता.

चित्रपटाची सुरुवात एका प्रसिद्ध व्हायोलिनवादकाच्या शोपासून होते. शोच्या आधी त्याला एक फोन येतो. ज्यात त्याला त्याच्या आईच्या निधनाची बातमी कळते. तरीही तो शो पूर्ण करण्याचा निर्णय घेतो. या संपूर्ण शोमध्ये त्याला त्याच्या गतायुष्याच्या आठवणी येत राहतात. हाच अमेरिगो आपल्या या चित्रपटाचा नायक. हॅपीनेस ट्रेनमधील मुलांपैकी एक. आपल्या आईबरोबर राहून छोटीमोठी कामं करून कसाबसा जगणारा. परिस्थितीने गांजलेली त्याची आई आपल्या मुलाचं थोड्या काळापुरतं का होईना भलं व्हावं म्हणून या हॅपीनेस ट्रेनमधून त्याला मोडेनाला पाठवण्याचं ठरवते. पण या उपक्रमाच्या विरोधात अनेक गैरसमजूतीही पसरवल्या जात असतात. जसं की तिकडे गेल्यावर या मुलांचे हातपाय तोडले जातील, त्यांना भिकेला लावलं जाईल. कम्युनिस्ट लहान मुलांना खाऊन टाकतात, त्यांना मारून साबण बनवण्यासाठी त्यांचा वापर करतात वगैरे वगैरे. आपल्याही मनात अगदी या नाही तरी अनेक शंका येऊन जातातच. कारण चांगुलपणावर, माणुसकीवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवूच शकत नाही. या ट्रेनमधून जाण्यासाठी विरोध करणारा अमेरिगो उंदरांना पांढरा रंग देऊन विकताना पकडला जातो. शिक्षेच्या भीतीने तो जाण्याचं कबूल करतो. अनेक शंकाकुशंका मनात घेऊन शेवटी अमेरिगो आणि त्याच्यासारखी अनेक मुलं त्या ट्रेनमध्ये चढतात.

पलीकडे अनेक मायाळू कुटुंबं त्यांची वाट पाहत असतात. आपल्या अमेरिगोचा नंबर मात्र सर्वात शेवटी लागतो. त्याचा स्वीकार करावा लागतो डेरना नावाच्या एका शेतकरी महिलेला. डेरनाने युद्धादरम्यानच्या चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतलेला असतो. तिच्या बॉयफ्रेंडला त्या दरम्यान जिवंत जाळलेलं असतं. परिस्थितीच्या चटक्यांनी पोळलेल्या प्रथमदर्शनीच रुक्ष वाटणाऱ्या डेरनाला निरुपायाने अमेरिगोला घरी घेऊन यावं लागतं. ती दुसऱ्या दिवशी आपल्या भावाच्या कुटुंबाशी अमेरिगोची भेट घालून देते. त्या घरामध्ये, शहरामध्ये डेरनाच्या आयुष्यात अमेरिगो हळूहळू रुळू लागतो. काही कटु प्रसंगानंतर डेरनाबरोबरचं त्याचं नातं गहिरं होत जातं. पहिल्या दिवशी त्याला मायेनं जवळं घ्यायला बिचकणारी डेरना आपल्या दुःखामध्ये त्याला सहभागी करून घेते. वह्या, कंपासपेटी अशा अत्यंत साध्या पण या मुलांना अप्राप्य वाटणाऱ्या वस्तू त्याला आणून देते. दोन वेळेचं जेवण, स्वच्छ कपडे या गोष्टीही ज्यांना मिळत नव्हत्या अशा या मुलांच्या प्राथमिक गरजा तर इथे भागतच होत्या, पण त्याखेरीज त्यांना संस्कारांची, प्रेमाची, मायेची ठेवही मिळत होती. अमेरिगोला इथेच त्याच्या पुढील आयुष्याची दिशा ठरवणारी देणगी मिळते ती डेरनाच्या भावाकडून. तो त्याला व्हायोलिनची ओळख करून देतो. ते वाजवायला शिकवतो. नेपल्समध्ये गरिबीत राहत असलेल्या त्याला आईकडून संगीताचा कान लाभला आहे. आईच्या गोड आवाजातील गाणी ऐकत तो मोठा झाला आहे. त्यामुळे संगीताची उपजत जाण असलेला अमेरिगो ही कला सहजपणे आत्मसात करायला सुरुवात करतो. मोडेनाहून नेपल्सला आल्यावर घरी आईकडे – आपल्या गावी जाण्याची ओढ असलेल्या अमेरिगोची ही ओढ हळूहळू कमी होते. आईने प्रवासासाठी निघताना दिलेलं एकमेव सफरचंद न खाता ते आपल्या हातात घट्ट पकडून ठेवणाऱ्या अमेरिगोची त्या सफरंचदावरची पकड हळूहळू सैलावते. मोडेनातील मुक्काम संपल्यानंतर परतताना सगळी मुलं आणि त्यांच्याशी मायेचं नातं जडलेली ही कुटुंबं सगळ्यांचीच अवस्था खूप बिकट होते. त्यातील काही मुलं आपण यांना भेटायला परत येऊ, ही आशा उराशी बाळगून तिथून निघतात. काही तिथेच राहतात. अमेरिगो मात्र आपल्या आईकडे परत येतो. आल्यासरशी तो आनंदाने त्याला भेट मिळालेलं व्हायोलिन तिला दाखवतो. ती मात्र रुक्षपणे ते व्हायोलिन पलंगाखाली सरकवते आणि “आता तू मोठा झाला आहेस, कामाला लाग. या चैनी आपल्यासारख्यांसाठी नाहीत,” असं खडसावते. आपल्याच आयुष्यातील या दोन टोकाच्या अनुभवांतील तफावत अमेरिगो सहन करू शकत नाही. तो सतत तुलना करत राहतो. पक्षाच्या कार्यालयात या मुलांसाठी त्यांच्या फॉस्टर पेरेंट्सनी पाठवलेल्या भेटवस्तू, पत्रं येत असतात.  डेरनाच्या पत्रांची, भेटवस्तूंची वाट पाहत राहतो. पण त्याची आई त्याला सांगते की, ‘ते लोक आता विसरले तुला! त्यांच्याकडून काही अपेक्षा करू नकोस.’ एक दिवस जेव्हा त्याला त्याच्या आईने व्हायोलिन विकल्याचं कळतं तेव्हा मात्र तो ज्या कार्यालयातून त्यांना पाठवलं गेलं होतं तिथे जातो. तिथली महिला कर्मचारी त्याच्यासाठी आलेली सगळी पत्रं त्याच्या हातात सोपवते. आपल्या आईने ही गोष्ट आपल्यापासून लपवल्याचं कळताच अमेरिगो पुन्हा मोडेनाला जाण्याचा निर्णय घेतो आणि आईला न सांगताच ट्रेनमधून निघून जातो तो परत न येण्यासाठी!

चित्रपटाच्या शेवटी अमेरिगो नेपल्सला आपल्या घरी येतो. तिथल्या वस्तूंमध्ये आपल्या आईचा स्पर्श शोधण्याचा प्रयत्न करतो. तिथेच त्याला पलंगाखाली सरकवलेलं धुळीनं माखलेलं व्हायोलिन मिळतं. त्याच्या आईने ते दुकानातून परत आणून ठेवलेलं असतं. त्या व्हायोलिनला कवटाळून रडणाऱ्या अमेरिगोवर कॅमेरा स्थिरावतो आणि चित्रपट संपतो. पण शेवटी ऐकू येणारं ,Those who let others go, love them more than those who keep them.’  हे वाक्य आपल्याला आईपणाच्या ताकदीची जाणीव करून देतो. आपल्या मुलाच्या हितासाठी अमेरिगोची आई त्याला पळून जाण्याची परवानगी देते. त्याला अडवत नाही आणि डेरनाला एका पत्रातून सांगते की,‘जर तू त्याला कायमचं ठेवून घेणार असशील तरच त्याला राहू दे तुझ्याकडे; नाहीतर लगेच इकडे पाठवून दे.’

यात अमेरिगोच्या आईचं नाव मुद्दाम लिहिलेलं नाही कारण स्वतःच्या मुलासाठी त्याच्यापासून कायमचं दूर राहणं स्वीकारणारी, वेळप्रसंगी कठोर निर्णय घेणारी ही आई जगातल्या सगळ्या आयांचं प्रतिनिधित्व करते. अमेरिगोचा कायमस्वरूपी स्वीकार करणाऱ्या डेरनामध्ये आपल्याला आई दिसतेच पण आधी दिसते ती माणुसकी. अशा अनेक मुलांना आसरा देऊन त्यांच्या आयुष्यात काही क्षण का होईना सुखाची, मायेची पखरण करणाऱ्या अशा अनेक डेरना, अनेक कुटुंब तेव्हा होती, यावर खरंच विश्वास ठेवता येत नाही. ही कुटुंब काही संपन्न, समृद्ध नव्हती; पण आपल्यातीलच घास ती या मुलांना देऊ करत होती. खरंच या हॅपीनेस ट्रेन उपक्रमान दक्षिण व उत्तर इटलीतील दरी थोड्याफार प्रमाणात सांधली गेली असेल. सामाजिक, राजकीय पातळीवर इतका महत्त्वाचा निर्णय या महिलांनी घेतला आणि तो यशस्वी करून दाखवला, ही बाब खूप महत्त्वाची आहे. संपूर्ण चित्रपट पाहत असताना आता काहीतरी वाईट होईल, संकट येईल, अमेरिगोला वाईट वागणूक मिळेल अशी शंकेची पाल मनात चुकचुकत राहते. पण नाही घडत असं काही. सगळं सुरळीत होतं. युद्धकाळात आपल्या मनाचा चांगुलपणा टिकवून ठेवणं किती अवघड असेल. पण हे घडलं आहे, हे नक्की. हा चित्रपट खऱ्या प्रसंगावर आधारित नाही पण अनुभवांवर आधारित आहे. सध्याच्या चित्रपटांच्या कथानकांमधील कपट, हिंसा, क्रौर्य यांच्या पार्श्वभूमीवर ‘चिल्ड्रन्स ट्रेन’ हा खरंच एक सुखद अपेक्षाभंग आहे.




©तृप्ती कुलकर्णी

छायाचित्र गुगलच्या सौजन्याने

 

.

 

 

सोमवार, २ डिसेंबर, २०२४

 



छंद माझा वेग???

ऑफिसच्या टीममधल्या एका नवीन सदस्याची ओख परेड सुरू होती. तीच प्रश्नावली सुरू होती,छंद कोणते, कशाची आवड आहे, इ. इ. त्यानिमित्ताने जुन्या सदस्यांच्या छंदांचीही उजणी झाली. त्यात एक-दोन पुरुषांचं उत्तर होतं, कुकिंग इज माय ह़ॉबी. पण मी अमुकच बनवतो, मला तमुकच बनवायला आवडतं अशा संदर्भासहित स्पष्टीकरणांनी मढलेली पुरुषांची वाक्य ऐकून इतरांच्या चेहेऱ्यावर उमटलेले कौतुकाचे भाव, अरे वा, हो का असे प्रशंसावाचक उद्गार या नेहमीच्या गोष्टी पार पडल्या. मग एका मुलीने सांगितलं मलाही कुकिंगची आवड आहे. ही मुलगी विवाहित होती. तिने हे सांगितल्यावर का कोण जाणे स्वयंपाकाची आवड असणाऱ्या मला तिचं वाक्य थोडं खटकलं आणि स्वतःचंच आश्चर्यही वाटलं. आता स्वयंपाकाची गोडी निर्माण झालेल्या मला स्वतःचाच रागही आला की मला असं कसं वाटू शकतंॽ असेल बाबा तिला कुकिंगची हॉबी.

स्वयंपाक करणं हा तिचा छंद आहे, ही चांगलीच गोष्ट आहे. पण एखादा दिवस ती म्हणाली,आज मला माझा छंद काही जोपासायचा नाही बा! तर चालेल का, असा प्रश्न मला पडला. स्वयंपाक, सूपशास्त्र ही मुात एक कला आहे, कौशल्य आहे की छंद, यावर मोठा परिसंवाद घडू शकेल.

आजच्या घडीला एखादी मुलगी जर म्हणाली की मला नाही बाबा स्वयंपाकात फारसा इंटरेस्ट, तर काही लोक कौतुक करतील तिचं, काही समोरून बोलतील की असं कसं चालेल काही मागून बोलतील. पण हा प्रश्न मुलाच्या बाबतीत येत नाही. त्याला असं स्पष्टीकरण द्यावं लागत नाही.

मुात गरज ही फक्त शोधाची नाही तर सगळ्याची जननी असते, यावर माझा ठाम विश्वास आहे. आता आपल्या पोटापाण्याची सोय आपणच पाहायची आहे,  हे जेव्हा कतं तेव्हा माणूस मग ती स्त्री असो की पुरुष  स्वयंपाकाची कला म्हणा कौशल्य म्हणा शिकून घेतोच. थोडं डावं-उजवं सगीकडेच चालतं. माझ्यामते तरी त्यात लिंगभाव आड येत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे खाण्याची आवड असणारा आणि वे पडल्यावर विराटाच्या घरी बल्लवाचार्य म्हणून राहणारा भीम. लहानपणी राघवेंद्र स्वामींच्या मठात जायचो तेव्हा तिथले स्वयंपाक रांधणारे-वाढणारे पुरुषच असायचे. तेव्हा त्याचं अप्रूप वाटायचं. आज अभिमान वाटतो. त्यामागची कारण वगैरे गोष्टी वेगळ्या. त्यांची चर्चा इथे करणं इष्ट नाही. आजकाल हॉटेल्स, मास्टरशेफ प्रतियोगिंतामध्ये वगैरे आपण या प्रांतातील पुरुषांची प्रगती पाहतोच आहोत.

पण असे पुरुष घराघरात असणं गरजेचं आहे. स्वयंपाक ही काही फक्त बायकांची मक्तेदारी नाही आणि ती नसावी.  सुधारक इथून लिंगभेद जेंडर डिस्क्रिमिनेशनवर घाव घालायला सुरुवात करू शकतात आणि सनातनी भीमाचा वारसा पुढे चालू ठेवू शकतात. परवाच कुठेतरी मी एक वाक्य वाचलं,कुकिंग इज जस्ट अ स्किल नॉट अ ड्यूटी. जसं तुम्ही तुमच्या आयुष्यात सायकल चालवायला शिकता आणि पुढे जाऊन दुचाकी वाहने, चारचाकीसुद्धा शिकता. त्या सायकलमध्येच अडकून बसत नाही, त्यातलीच ही गत आहे. प्रत्येकाला पोटापुरतं तरी रांधता आलं पाहिजे. मग पुढे जाऊन तुम्ही तो छंद म्हणून स्वीकारा, व्यवसाय म्हणून स्वीकारा किंवा कर्तव्य म्हणून तो तुमचा प्रश्न! घरातील प्रत्येक लहान मुलाला आणि मुलीला स्वयंपाकाचे प्राथमिक धडे देणं गरजेचं आहे. जी गोष्ट आपल्याकडे सध्या होत नाही. जसं आपण मुलांना सायकल येणं गरजेचं आहे म्हणतो तसंच ही गोष्टसुद्धा गरजेची आहे, याची जाणीव व्हायला हवी. लिंगभेदावर मात करण्याचा हा कदाचित एक सहजसोपा उपाय ठरू शकतो. ज्याची सुरुवात आपण कुठलीही आंदोलनं न करता आणि भाषणं न देता करू शकतो.

©तृप्ती कुलकर्णी

छायाचित्र गुगलच्या सौजन्याने