न पाहिलेलं स्वप्न!
भारतीय महिला क्रिकेट संघानं विश्वचषक मिळवला. महिला क्रिकेटचं अनेक दशकांपासूनचं अपुरं स्वप्न पूर्ण केलं. आता या विजयामुळे महिला क्रिकेटची व्यावसायिक गणितं बदलतील, महिला क्रिकेटला नवी दिशा मिळेल. आपल्या संघातल्या सर्वच खेळाडूंची कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद अशीच आहे.
आता तुम्ही म्हणाल सगळं जग हेच सांगतंय. यात तुम्ही काय भर घालताय, नवीन काय सांगताय...तेच तेच काय वाचायचं सारखं. पण हे सामने सुरू झाल्यापासून आत खोलवर काहीतरी घडत होतं, कळत होतं पण वळत नव्हतं. याआधी महिला संघ विश्वचषक खेळला नाही, अटीतटीचे सामने खेळला नाही, असंही काही नव्हतं. पण यावेळेस बातच काही और होती. इतकी वर्ष उपेक्षा सोसलेल्या या संघावर अचानक संपूर्ण देशाच्या अपेक्षांचं ओझं लादलं गेलं आणि या पोरींनीही त्या अपेक्षा पुऱ्या केल्या, प्रतिस्पर्धींना पुरून उरल्या. मैदानांवर अत्यंत संयतपणे, डाव आखून खेळणाऱ्या या मुलींनी सामना जिंकल्यावर तितक्याच खुल्या दिलानं रडून विजयही साजरा केला. त्यांच्या खेळाला मिळालेल्या ग्लॅमरचं शिवधनुष्य पेलण्याची ताकदही त्यांच्यात आहे, हे त्यांनी त्यांच्या विजयोत्सवातून दाखवून दिलं.
हा विजयोत्सव पाहताना एखादं न सुटणारं गणित अचानक सुटावं तसं इतके दिवस काय खुपत होतं ते उमजून गेलं. क्रिकेटमधलं करिअर वगैरे गोष्टी खिजगणतीतही नसलेल्या आणि आयुष्यभर पुरुषांच्या क्रिकेटचे सामने पाहून त्यातचं खूश होणाऱ्या आमच्यासारख्या ‘बायकांना’... हो एके काळी जीव तोडून क्रिकेट खेळणाऱ्या आणि आता बायका कॅटेगरीत मोडणाऱ्या ‘आम्हा मुलींना’ या सामन्यांनी एक अनामिक समाधान दिलंय.
संध्याकाळी शाळेतून आल्यावर, सुट्टीच्या दिवशी, सोलापूरच्या मे महिन्याच्या दुपारी रणरणत्या उन्हात आमचं मानसमधलं (आमच्या बिल्डिंगमधलं) टोळकं खाली जमायचं. टीम पाडल्या जायच्या आणि “और ... ने अपना खाता खोला!!!” या राजेश काकांच्या वाक्याने आमची मॅच सुरू व्हायची आणि मग पुढे काय व्हायचं कळायचं नाही. रोज नव्यानं कळणारे नियम, बॉल इकडे गेला की फोर, अमुक एका भिंतीच्या पुढे गेला की २ रन वगैरे नियम तेव्हा जगन्मान्य आहेत, असचं वाटायचं. या मॅचवर आपलं आख्खं आयुष्य अवलंबून आहे, अशा पोटतिडकीनं, दातओठ खात मॅच खेळली जायची. भांडणं, रडारड, चिडाचिड सगळं व्हायचं. कधी मॅच अर्ध्यातच संपायची, कधी कुणी जिंकायचं तर कधी कोणी हरायचं. पण काही झालं तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळे तिथे हजर व्हायचे.
तेव्हा आम्ही मुलं-मुली एकत्र खेळायचो. सुदैवानं आमच्या घरात तरी मुलींना काय करायचंय क्रिकेट वगैरे खेळून असलं काही ऐकावं लागलं नाही, कारण ‘जास्ती की मेजॉरिटी’ मुलींचीच होती. जरी क्रिकेटच्या बाबतीत जास्त प्रोत्साहन वगैरे दिलं गेलं नाही, तरी कधी कुणी आडकाठीही केली नाही. त्यामुळे मनसोक्त खेळायला मात्र मिळालं. खेळताना कळत गेलं की मुलगी म्हणून बॉलिंग करताना, बॅटिंग करताना आपला जोर कमी पडतो, मग ती उणीव भरून काढायची एक चटक लागली. आऊट व्हायचं नाही, वेगवेगळ्या पद्धतीने बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न करायचा आणि हे सगळं करताना शिकवणारे होते राजेश काका! आमचं आराध्यदैवत. ते म्हणतील ते प्रमाण असायचं आमच्यासाठी. त्यांनीच आम्हाला रोज शाळेतून आल्यावर नियमित व्यायाम करावा लागेल, हे सांगितलं. आमच्या कंपूमध्ये हरतऱ्हेचे नमुने होते. अतिशय हुशारीनं ते प्रत्येकासाठी वेगळा नियम बनवत. आमच्या घडणीच्या वर्षांमध्ये आम्हाला त्यांनी खूप काही दिलं. खरं तर त्यांना आमच्यासारख्या शाळकरी पोरांमध्ये रमण्याचं काही कारण नव्हतं, पण असतात अशी काही माणसं जी आपल्या आयुष्यावर खूप मोठी छाप पाडून जातात.
तर कालचा महिलांच्या विश्वचषकाचा अंतिम सामना पाहिल्यावर आमचा क्रिकेटचा हा छोटासा प्रवास माझ्या डोळ्यांसमोरून तरळून गेला. त्या काळी छोट्या शहरांमध्ये मुलीच काय मुलांनीही क्रिकेटमध्ये करिअर करणं हे स्वप्नवतच होतं. जिथे मुलांची ही गत होती तिथे मुलींचा तर प्रश्नच उद्भवत नाही. पण आज भारतीय संघानं मिळवलेला हा विजय अशा छोट्या-छोट्या शहरांमधून आलेल्या मुलींनीच मिळवलेला आहे. अशा लहानमोठ्या गल्ल्यांमध्ये खेळणाऱ्या कितीतरी मुलींना आपण हे स्वप्न पाहू शकतो, याची जाणीवही नव्हती. पण तरीही त्या मुलांइतक्याच त्वेषाने खेळत असत. फक्त या खेळाच्या प्रेमापोटी.
आता परिस्थिती बदलली आहे. अशा मुलींना आता योग्य दिशा मिळाली आहे, याचं समाधान आहे. जिथे मुलामुलींमध्ये भेदभाव केला जायचा तो कमी होईल. मुलींना योग्य संधी लाभतील. आता सगळ्याच खेळांकडे व्यावसायिक पातळीवरून पाहिलं जातयं. कोचिंग, ट्रेनिंग सगळ्या गोष्टी एकदम फोकसने होताहेत. ही चांगलीच गोष्ट आहे. महिला क्रिकेटचे ‘अच्छे दिन’ आता खूप मोठ्या प्रतीक्षेनंतर आणि आधीच्या टीमच्या तपश्चर्येनंतर सुरू होतील.
हे सगळं ग्लॅमर फक्त क्रिकेटलाच का, बाकीच्या खेळांचं काय, हा प्रश्न तूर्तास तरी बाजूला ठेवूया. काही झालं तरी या खेळात आपल्या देशाला बांधून ठेवण्याचं सामर्थ्य आहे, हे मान्य करावचं लागेल. माझा नवरा काल मॅच संपल्यावर म्हणला,“या देशातल्या फक्त पुरुषांच्याच नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या नसांनसांतून क्रिकेट वाहतंय - मग ती स्त्री असो किंवा पुरुष!” कालच्या सामन्यानंतर स्टेडियममध्ये, संपूर्ण भारतात झालेल्या जल्लोषाने हेच सिद्ध झालंय. विश्वविजेत्या महिला संघाचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. त्यांनी अनेक मुलींच हे ‘न पाहिलेलं स्वप्नही’ पूर्ण केलंय, त्यांनी मेहनतीनं तयार केलेला हा विजयमार्ग फक्त क्रिकेटच नाही तर सर्व खेळांसाठी प्रेरणादायी ठरो. क्रिकेटसाठी कायमच भारतीयांची मनं कायमच म्हणतात,“दिल मांगे मोअर!”
©तृप्ती कुलकर्णी
छायाचित्र –गुगलच्या सौजन्याने
ही पोस्ट आवडल्यास माझ्या नावासहित पुढे पाठवू शकता.
आणखी लेख वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला भेट द्या व फॉलो करा.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा